हिंगोली – महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेचे फायर ब्रॅंड नेते खासदार संजय राऊत 100 दिवसांनी तुरुंगावासातून जामीनावर बाहेर पडले. ज्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात एक नवी ऊर्जा संचारली आहे. अशा परिस्थितीत आज ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला साथ दिली आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा नांदेडमधून हिंगोलीत दाखल झाली आहे. या यात्रेला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेनिमित्ताने आज गांधी आणि ठाकरे कुटुंबातील दोन तरुण राजकीय नेते प्रथमच एकत्र दिसले. कॉंग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते.
शिवसेनेचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार सचिन अहिर यांनीही आज या यात्रेत सहभाग घेतला. यावेळी शिवसेना युवासेना नेते आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत पायी चालू लागले.
या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत थेट पोहचण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचेही यातून दिसत आहे. दरम्यान, काल हिंगोलीत राहुल गांधींच्या या यात्रेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले होते. ज्यात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील आदी नेते सहभागी झाले होते. यावरून भारत जोडो यात्रेला मित्रपक्षांकडून पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे.
राहुल- आदित्य भेटीचे महत्व –
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीचे आणि सोबत चालण्याचे अनेक अर्थ निघू शकतात व ते कदाचित राज्याच्या राजकारणात दूरगामी आणि चांगले परिणाम साधू शकतात. राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा कॉंग्रेस नेत्यांकडून संभ्रम निर्माण करणार वक्तव्ये केली जात होती. विशेषत: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आता राहुल यांच्या यात्रेत पायी चालत आहेत तेही मध्येच स्वबळाचा नारा देत होते. त्यामुळे आघाडी सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
आता या दोन नेत्यांमध्ये जर ट्युनिंग जुळले तर राहुल यांचे आदित्य यांना समर्थन मिळू शकते. जे आता लगेचच नाही, पण भविष्यात ठाकरे गटाला व पुन्हा आघाडीचा प्रयोग करण्याची वेळ आली तर दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त ठरू शकते. मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे संकेत उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या कदाचित लगेचच होणारही नाहीत. मात्र आता ठाकरेंसमोर सगळ्यांत मोठे आव्हान आहे ते मुंबई महापालिका आपल्याकडे राखण्याचे. त्यात ठाकरे गटाला कॉंग्रेसची मोलाची साथ मिळू शकते. कारण मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा कॉंग्रेसच प्रबळ आहे. तूर्त कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी राहुल- आदित्य भेट ते गणित बदलू शकते.