अकोले – होम क्वारंटाइनचा शिक्के मारण्यासाठीची शाईची उपलब्धता नाही. त्यामुळे हा शिक्का हातावर राहणार कसा? ही शाई तातडीने उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी कळस बुद्रुकच्या ग्रामपंचायतीने केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व दुसऱ्या जिल्ह्यांतून अथवा गर्दीच्या ठिकाणाहून कळस गावात 168 लोक, तर परदेशातून एक व्यक्ती आलेली आहे. त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारण्याचे काम आरोग्य विभाग व ग्रामपंचायतच्या वतीने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली. त्यामुळे शहरांमधील नोकरवर्ग व इतरही लोकांमध्ये एकच चलबिचल झाली. तेंव्हापासून लोकांनी गावाकडे धाव घेतली असून, अजूनही दाखल होत आहेत. या सर्वांची माहिती कळस बु. ग्रामपंचायतीने घेतली आहे. त्यामध्ये 168 नागरिकांची नोंद झाली. एक व्यक्ती परदेशातून आली आहे. याशिवाय काही लोक नोंद न करता घरात राहत आहेत.
कळस बु. ग्रामपंचायत व कळस प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी आरोग्यसेविका प्रतिभा अंदुरे, आरोग्यसेविक अनिल सोनार, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, माधव वाकचौरे, शंकर वाघमारे, आशा सेविका विद्या वाकचौरे, सुनीता गवांदे घरोघरी जाऊन सर्व्हे करीत असून, लोकप्रबोधन करीत आहेत. परदेशी व्यक्तीला दररोज भेट देत असून, त्याची नगर येथील जिल्हा रुग्णालयात टेस्ट केली असता, ती निगेटिव्ह आली आहे. ही व्यक्ती स्वतःच घरात बसणे पसंत करीत आहे, असे प्रतिभा अंदुरे यांनी सांगितले.
कळस गावच्या सरपंच योगिता वाकचौरे या सुध्दा जनतेला करोनाबाबतीत जनजागृती करीत असून, उपसरपंच दिलीप ढगे याबाबत योग्य काळजी घेत आहेत. सोसायटी अध्यक्ष विनय वाकचौरे यांनी रेशन धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्स नॉर्मसचा वापर केला आहे. नगर जिल्हा बॅंकेच्या दारात सॅनिटायझरचा वापरून करूनच बॅंकेत एकावेळी दोन, तीन व्यक्तीला प्रवेश दिला जातो, असे शाखा व्यवस्थापक प्रज्ञा पारधी यांनी सांगितले. ग्रामसेवक योगेश ससाणे, कामगार तलाठी रोशन गायकवाड हे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सवांद साधत आहेत. किराणा दुकान, कृषी सेवा केंद्र, दूध संस्था यांनी सोशल डिस्टन्स नॉर्मसचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय काही तरुण विनाकारण फिरताना आढळतात. त्यांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.