पानमळ्यात पाने जागीच सडू लागली; पान बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
रेडा (प्रतिनिधी)-राज्यातील करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेला निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पान बाजार बंद केल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे पानमळ्यातील पाने जाग्यालाच सडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्चून पानाच्या तोडणीपर्यंत आणलेल्या पान मळ्याच्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान होऊ लागले आहे.
निमगाव केतकी परिसरामध्ये तसेच वरकुटे खुर्द व उजनी बॅक वॉटर पट्ट्यातील आजोती, पिंपरी, पडस्थळ या भागात शेकडो शेतकऱ्यांनी परंपरेनुसार पानमळे जतन केले आहेत. तोडणीसाठी आलेल्या पानमळाधारक शेतकऱ्यांनी पानाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावातील व शहरातील पानटपऱ्या बंद केल्यामुळे, जेथे पान विक्री या शेतकऱ्यांची होत होती, तेथे खंड पडला आहे. त्यामुळे शेतातच या पानाचे नुकसान होऊ लागले आहे. खरेतर जीवनावश्यक वस्तुंमध्ये भाजीपाला, फळांची खरेदी-विक्री सुरू आहे. मात्र नागवेली पाने ही शेतातच तयार होतात यांची खरेदी-विक्री कशासाठी बंद आहे असाही सवाल शेतकरी करीत आहेत.
सध्या मागील काही दिवसांपासून निमगाव केतकी येथील एकमेव भरणारा पान बाजार होता. तो बंद केला असल्याने पान मळ्यातील पाने जागेवर सडून चालली आहेत. सद्यस्थितीला माझ्या पाळ्यांमध्ये 100 डाग पानाचे तयार आहेत मात्र याला विक्री करता येत नसल्यामुळे किमान मला दीड ते पावणे दोन लाख रुपयांचा फटका बसलेला आहे. पोलीस बाहेर जाऊ देत नाहीत, मजूर शेतात मिळत नाही झालेला खर्च तरी आम्हाला मिळावा ही अपेक्षा आहे, अशी मागणी शेतकरी सुधीर गुटाळ यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पानमळे धारक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पानाचे बाजार राज्यामध्ये सुरू करण्यासाठी आदेश द्यावेत.
गेल्या पंधरा दिवसांपासूनआम्हा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे, नुकसान भरपाई सरकारने शेतकऱ्याला दिली तरच शेतकरी जगेल अन्यथा शेती विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही, अशी खंत शेतकरी संपतराव पवार यांनी व्यक्त केली. तर, पानमळा धारक शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. विड्याच्या पानासाठी निमगाव केतकी परिसर व उजनी बॅक वॉटर पट्ट्यातील गावे प्रसिद्ध आहेत. या शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पानमळे जगवलेले आहेत, मात्र जो पान बाजार बंद झाला आहे, तो सुरू करण्यासाठी त्वरित प्रयत्न केला जाईल, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.