अकोले – अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथील आपली विवाहित कन्या सविता भगवान हुलवळे हिचा मृत्यू संशयास्पद आहे. अकोलेचे पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप करून तिच्या घरच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी धामणगाव आवारीचे पुंजा आवारी यांनी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना आवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मुलीचा विवाह चैत्यन्यपूर येथील भगवान भाऊ हुलवळे यांच्याशी झाला होता. सदर कुटुंबीय 25 वर्षांपासून तिचा छळ करून मारहाण करीत होते. 25 मार्च रोजी सकाळी सहा वाजता तिचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण विचारले असता, गायीने मारले व तिचा मृत्यू झाला, असे कारण सांगितले. गायीने मारले मग तिला दवाखान्यात का नेले नाही, अशी शंका विचारली.
मात्र त्याचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यास विरोध केला. त्यामुळे आपण स्वतः मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेला. त्यात डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने मारल्याचे सांगण्यात आले. याबाबत तीन-चार दिवसांपासून गुन्हा दाखल करण्याची विनंती अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्याकडे करीत असून, ते टाळाटाळ करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गुन्हा दाखल न केल्यास 5 एप्रिलला उपोषण करण्याचा इशारा आवारी यांनी दिला आहे.