शाळा, अंगणवाड्यांचे मोठे नुकसान
महसूल विभागाकडून पंचनामा : मुळशी आणि मावळसह खेड तालुक्याला तडाखा
पुणे – निसर्गाची देणगी लाभलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुळशी आणि मावळसह खेड तालुक्याला “निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. धरण आणि घाटमाथा परिसरातील घरे, शाळा, अंगणवाड्या यासह ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रे उडाले, भिंती पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील 9 तालुक्यांत 235 घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये 4 हजार 511 घरांचे पत्रे उडाली, तर 725 घरांचे मोठे नुकसान झाले आहे. 134 शाळा, 73 अंगणवाड्यांचे पत्रे आणि भिंत पडली आहे. तर 20 ग्रामपंचायतीचे पत्रे उडून गेली. खेड तालुक्यात 1,296 घरांचे पत्रे उडाले आहेत. तर 113 घरांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ मावळात 1,261 घरांचे पत्रे उडाले असून, 165 घरांचे जास्त नुकसान झाले आहे. मुळशी तालुक्यात 750 घरांचे पत्रे उडाले असून, 137 घरांचे जास्त नुकसान झाले आहे. अन्य तालुक्यातील घरांची परिस्थितीत (तालुक्याचे नाव, पत्रे उडालेल्या घरांची संख्या आणि कंसात जास्त नुकसान झालेली घरे)वेल्हे – 608 (57), आंबेगाव – 418 (15), भोर – 21 (14), हवेली – 43 (2), जुन्नर 110 (222), पुरंदर – 4 (0).
चक्रीवादळामुळे चौघांचा मृत्यू, तिघे जखमी
चक्रीवादळामुळे जिल्ह्यात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. खेड तालुक्यात घराचे पत्रे आणि भिंत पडल्यामुळे आई आणि मुलाचा मृत्यू झाला. हवेली आणि जुन्नर तालुक्यांतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच तिघे जखमी असून, मुळशी, मावळ, खेड आणि जुन्नर या भागात काही व्यक्तींना किरकोळ जखम झाली आहे. चक्रीवादळात 26 जनावरे दगावली असून, त्यात मावळ तालुक्यातील 12, खेडमधील 10, मुळशीतील दोन तर पिंपरी-चिंचवड व जुन्नर मधील प्रत्येकी एका जनावाराचा मृत्यू झाला आहे.
शेतकऱ्यांनाही जबर फटका
निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ, मुळशी, शिरूर, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि इंदापूर या सात तालुक्यांतील 371 गावांमधील 28 हजार 496 शेतकऱ्यांच्या 7 हजार 874 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला व फळपिकांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यात 2, 906 हेक्टरवरील फळपिके आणि 2,692.72 हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ इतर पिके 1 हजार 92.45 हेक्टर, मका 574.65 हेक्टर, बाजरी 572.50 हेक्टर, कांदा 35.40 हेक्टर आणि 0.60 हेक्टरवरील फुले यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान जुन्नर तालुक्यात झाले असून, 5 हजार 735 हेक्टर शेतीवरील पिकांना फटका बसला आहे. आंबेगाव तालुक्यातील 1 हजार 323 हेक्टर, खेडमधील 638.8 हेक्टर, मावळ 81.45 हेक्टर, मुळशी तालुक्यातील 41.2 हेक्टर व इंदापूर तालुक्यातील 21.65 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या घरांचे पत्रे उडाले त्यांना महिला व बालकल्याण योजनेतील काही निकष बदलून मदत देण्यात येणार आहे.
शाळा, अंगणवाड्या दुरूस्तीसाठी डीपीसीला प्रस्ताव पाठविण्यात येईल. तर पोल्ट्री, गोठा, पॉली हाऊस यांना सीएसआरच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामपंचायत कार्यालयांची दुरूस्ती ग्रामनिधीतून करावी लागणार आहे. तसेच राज्य शासनाकडून आपत्ती व्यवस्थापनातून निधी जाहीर केला तर ती मदतही पुरवली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.