केंदूर, – सोनिया गांधींचा विदेशी असल्याचा मुद्दा पुढे करून पवार साहेबांनी काँग्रेस सोडली. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद मिळत असताना नाकारले. 2019 मध्ये भाजपमध्ये जायचे ठरले आणि त्यांनी माघार घेतली.
ही धरसोडवृत्ती राजकीय निर्णयांमध्ये घातक ठरते, असे मी पवार साहेबांना सांगितले. तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता असाउ गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. या धरसोडीला कंटाळून मी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला आणि तुमच्यापुढे उभा आहे, असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केंदूर (ता. शिरूर) येथील श्रीराम चौकातील सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शिरूरमधील बारा गावांच्या दुष्काळ संपवायचा आहे आणि तो हा अजित पवारच संपवणार. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्ग काढलेला आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव यांनीही प्रयत्न केल्याने या प्रश्नाबाबत सर्व्हेक्षणाचे आदेशही झालेले आहेत. फक्त मतदानात बिलकुल हयगय न करता शिवाजीराव आढळरावांना साथ द्या. माजी गृहमंत्री बापासाहेब थिटे यांच्या स्मृतींना देखील या निमित्ताने अजित पवार यांनी उजाळा दिला.
पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपसभापती सविता प-हाड, प्रमोद प-हाड, सविता बगाटे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, सतीश थिटे, भगवानराव शेळके, चंदन सोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे म्हणाल्या, शिरुरच्या या भागातील दुष्काळ, येथील पाणी प्रश्न आणि त्याच्या निराकरणासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळरावांसह देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठका झाल्या आहेत. त्यासाठी आणखी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर आभार सरपंच अमोल थिटे यांनी मानले.
साठीनंतर निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले
भाजपसोबत जाणे म्हणजे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणणे यासाठी हा निर्णय होता. वयाच्या साठीनंतर तरी हा निर्णय घेतला. त्यामुळे निर्णयाचे स्वातंत्र्य आता तरी मिळाले एवढेच सांगतो. अखेर एक सांगतो, इतरांकडून इथले वातावरणही भावनिक करण्याचा प्रयत्न होईल. तसे काही होऊ देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.