मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि नाव हे शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. त्यातच सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चालल्याची टीका केली. याच टीकेला आता उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अमित शाहांच्या टीकेला उत्तर देताना,” मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये शाह यांना उत्तर दिले. तसेच आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी,”मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा मी हिंदुत्व सोडलं म्हणाले. तुम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? की तेव्हा हिंदुत्वापासून टाइम प्लीज घेतली होतीत? असाही सवाल देखील उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. प्रमोद महाजन यांना एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की एक दिवस असं होईल की देशातले लोक हिंदू म्हणून मतदान करतील. आज हिंदू जागा झाला आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम सुरू आहे. निवडणूक आली की हिजाबचा मुद्दा काढायचा, गोहत्येचा मुद्दा काढायचा असे मुद्दे काढून हिंदूंच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
इन्कम टॅक्स, ईडी यांच्यासारखे लांडगे विरोधकांवर सोडायचे आणि त्यानंतर मी एकटा लढतोय सांगायचं याला काय अर्थ आहे? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज सगळ्या गोष्टी फक्त बुद्धिबळाच्या पटासारख्या झाल्या आहेत. आमच्यातल्या काही लोकांना यांनी पट्टा बांधून सोबत नेलं आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
माझ्या पक्षातले काही लोक दुसरीकडे गेले. माझेच लोक मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहात आहेत. त्यांना आता मालक व्हायचं आहे. आमचा निवडणूक आयोगही असा आहे की चोरांना मालक केलं आहे. आज सगळ्या विरोधी पक्षांनी डोळे उघडले पाहिजेत कारण आज जे आमच्यासोबत झालं ते उद्या तुमच्यासोबत होईल. यांना बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नको असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
दरम्यान, काल आमच्या युतीला मोठा विजय मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही मिळालं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जे लोक खोटेपणाच्या आधारावर हुंकारत होते त्यांना आता सत्य काय आहे ते समजलं आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही निवडणूक युती म्हणून लढलो. स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली त्यानंतर मुख्यमंत्री हे पद मिळावं म्हणून विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले. त्यांना आज सत्य काय आहे समजलं आहे असं अमित शाह यांनी म्हटले होते.