पुणे -शिक्षण आयुक्तालयात ऑनलाइन टपाल ट्रॅकिंग सिस्टिम सुरू करण्यात आल्यामुळे तक्रारी, निवेदने यांचा जलद गतीने निपटारा होत आहे. गेल्या अडीच महिन्यात विविध विषयांबाबत तब्बल 931 तक्रारी, निवेदने दाखल झाली होती. त्यातही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतांबाबची गाऱ्हाणे मांडणारी निवेदने अधिक असल्याचे आढळले. टपाल ट्रॅकिंग सिस्टिममुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पारदर्शक कामकाजाची शिस्त लागत आहे.
शिक्षण आयुक्त कार्यालयात सतत शिक्षक, कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, संस्थाचालक, विद्यार्थी व पालक संघटनांचे पदाधिकारी यांची सतत गर्दी असते. शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकी या कार्यालयांकडून प्रकरणे ठराविक कालावधीत निकाली निघत नाहीत. यामुळे अनेकजण दाद मागण्यासाठी थेट शिक्षण आयुक्त कार्यालयच गाठतात. यासाठी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण विभागाचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यास सक्षमपणे सुरुवात केलेली आहे. “टेक्नोसेव्ही’ पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. टपाल ट्रॅकिंग सिस्टिम त्याचाच एक भाग आहे.
टेक्नोसॅव्ही पद्धत…
तसे पाहता शिक्षण विभाग हा फाइल्स आणि कागदपत्रांच्या गोंधळात अडकलेला दिसून येतो. पण, आता या विभागानेही पेपरलेस कामकाजाची सवय करून घेतली असून, शिक्षण विभागाच्या बहुतांश कार्यालयांत तंत्रज्ञान वापरून प्रकरणांचा निपटारा केला जात आहे.
साडेतीन हजार प्रकरणे निकाली
शिक्षण आयुक्त कार्यालयात 1 डिसेंबरपासून टपाल ट्रॅकिंग सिस्टिमच्या वापरास सुरुवात झाली. या प्रणालीमुळे टपालांचे ट्रॅकिंग होत असल्याने टपाले त्वरीत निकाली काढण्यास अधिकारी, कर्मचारी प्राधान्य देत आहेत. अडीच महिन्यांत एकूण 5 हजार 536 विविध प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील 3 हजार 692 प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. 2 हजार 375 प्रकरणांना जावक क्रमांकही मिळालेले आहेत.