पुणे – ‘करोना’ या तीन अक्षरी शब्दांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी जगभरात मोठा धुमाकुळ घातला होता. जगात करोनाची कोट्यावधी लोकांना लागण झाली. तर करोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाल्याचं आपण पाहिलं आहे. दरम्यान, अश्यातच आता करोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण सक्रिय झाले असून दिवसागणित रुग्णसंख्येत अधिकाधिक वाढ होताना दिसत आहे. अश्यातच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला आवाहन करत खडे बोल सुनावले आहेत. यावेळी अजित पवार समाज माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, “हे सरकार करोना विषाणूबद्दल गंभीर नसून, करोना परिस्थिती काय आहे? याची नेमकी परिस्थिती सांगा असं अधिवेशनात मागणी करत सरकारला सांगितलं होतं. पण या सरकारला गांभीर्य दिसत नाही. सरकारी कार्यलय असो किंवा सामान्य नागरिक त्यांना मास्कवरून आदेश काढले पाहिजेत.
मात्र, मंत्री आणि अधिकारीच स्वतः मास्क वापरात नाहीत. त्यामुळे जनतेला गांभीर्य राहिलेलं नाही. सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील करोनाची सध्याची वस्तू स्थिती जनतेला सांगावी. जर त्यांना अयोध्येला जायचं असेल तर जाऊद्या. राज्यात उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री राज्यात उपलब्ध आहेत त्यांनी करोनाची स्थिती सांगितली पाहिजे’. असं अजित पवार म्हणले आहेत.
पुण्यात करोना लसीचा तुटवडा…
पुणे महापालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पालिकेच्या दवाखन्यामध्ये एक एप्रिलपासून लस उपलब्ध नाही. केंद्रसरकारकडून राज्यसरकारकडे लस उपलब्ध होईल, त्यानंतर ती महापालिकेला मिळेल. त्यासाठी आठवडाभर वाट पहावी लागणार आहे. असं डॉ. भगवान पवार यांनी सांगितलं आहे.