मेढा, (प्रतिनिधी) – केळघर आणि मेढा भागातील पाणी टंचाईचे निवारण करण्यासाठी दिवंगत विजयराव मोकाशी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी, बोंडारवाडी धरणाची निर्मिती व्हावी म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या धरणाबरोबर जावळीच्या विकासासाठी जे जे गरजेचे आहे, ते करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
बोंडारवाडी धरण कृती समिती आणि श्रमिक मुक्त दलाच्यावतीने केळघर, मेढा परिसरातील 54 गावांच्या ग्रामस्थांचा मेळावा नांदगणे, ता. जावळी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, आनंदराव जुनघरे, मोहनराव कासुर्डे, आदिनाथ ओंबळे, नारायण सुर्वे, नारायण धनावडे, राजू जाधव, नंदकुमार बावळेकर, भीमराव केळगणे उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बोंडारवाडी धरणासाठी एक टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही बोंडारवाडी धरण निर्मितीसाठी मी प्रयत्न केले. संबंधित अधिकारी, बोंडारवाडी ग्रामस्थांशीही वेळोवेळी बैठका घेतल्या.
या परिसरातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. धरणाबरोबरच बंदिस्त पाइपलाइन, ज्यांचे क्षेत्र धरणात जाणार आहे, त्यांना पुनर्वसनाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. बोंडारवाडी धरण कृती समिती व आपण सर्व एकत्र प्रयत्नशील असून, विजयराव मोकाशी यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
डॉ. पाटणकर म्हणाले, आपण सर्व जण एकत्र आलो असल्याने धरणासाठी काही अडचण नाही. आगामी निवडणुकांपूर्वी धरणासाठी निविदा प्रक्रिया होण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि कृती समितीची बैठक मंत्रालय पातळीवर व्हावी. राजू जाधव, नारायण धनावडे, विनोद शिंगटे, वैभव ओंबळे, मोहन भणगे यांची भाषणे झाली. बोंडारवाडी धरण कृती समितीचे प्रमुख आदिनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ जाधव यांनी आभार मानले.