घरचे गडगंज असतानाही केवळ गृहिणी बनून राहणे अजिबात पसंत नव्हते. काहीतरी वेगळे करण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या वैशाली भोसले यांनी उद्योग क्षेत्रात आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कोणी वकील आहेतर कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक म्हणून काम करताना दिसतात. परंतु नोकरीच्या मागे न लागता घरचे गडगंज असतानाही व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे कराडच्या सौ. वैशाली प्रशांत भोसले यांनी. दरररोजच्या जेवणात वापरण्यात येणारे मसाले वेगवेगळ्या पद्धतीने तयार करून अवघ्या तीन वर्षात त्या मसालाक्विन बनल्या आहेत. तीन वर्षात तीस प्रकारचे वेगवेगळे मसाले तयार करून बाजारपेठेतील इतर स्पर्धकांना त्यांनी आव्हान उभे केले आहे. इतकेच नव्हेतर परदेशातूनही त्यांनी तयार केलेल्या मसाल्यांना मागणी होत आहे.
वैशाली यांचे माहेर सातारा. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती प्रशांत भोसले हे पर्यावरण खात्यात नोकरीस. त्यामुळे पैशांची कोणतीच कमतरता नव्हती. परंतु वैशाली यांना शिक्षणाची आवड होती. शिक्षण मागे पडल्याची खंत त्यांना सतत सलत होती. याची जाणीव प्रशांत भोसले यांना झाल्याने त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन महाविद्यालयात वैशाली यांचा प्रवेश घेतला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांच्याच पुढाकारामुळे पूर्ण झाले. प्रशांत भोसले यांची पुणे येथे नोकरीनिमित्त बदली झाल्याने ते पुण्यात स्थायिक झाले.
परंतु वैशाली यांच्या हाताला चव असल्यामुळे प्रशांत भोसले यांच्या मित्रांनी त्यांच्या पत्नीने एखादा हॉटेल सुरू करावे असा प्रस्ताव ठेवला. यावर पतीकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे वैशाली यांनी कांदा-लसूण चटणी बनवायला सुरूवात केली. ही चटणी त्यांनी पुण्यात घरोघरी विकायला सुरूवात केल्याने तेथे दहा ते पंधरा किलो चटणी विक्री होऊ लागली. तेथे व्यवसायाचा जम बसत असतानाच पती प्रशांत यांची कोल्हापूर येथे बदली झाली. त्यामुळे पुण्यातील व्यवसाय मध्येच सोडावा लागला. अनेकांनी कोठेही जा परंतु आम्हाला चटणी पाठवत जा अस आवर्जून सांगितल्याचे वैशाली यांनी सांगितले. त्यामुळे मी कोठेही गेले तरी माझ्या जुन्या ग्राहकांना आजही विविध प्रकारच्या चटण्या पोहोचवण्याचा माझा हट्ट असतो.
कोल्हापूर येथे बदली झाल्यानंतर वैशाली यांना पुन्हा सुरूवातीपासून व्यवसायाची सुरूवात करावी लागली. कोणत्याही व्यवसायामध्ये मार्केटींग हा भाग तितकाच महत्त्वाचा असतो. मात्र, वैशाली यांना विशेष असे मार्केटींग करण्याची कधी वेळच आली नाही. त्यांचे जुने ग्राहक हीच त्यांच्या मार्केटींगच्या स्त्र्रोत बनले. त्यांच्या माध्यमातून आजही वैशाली भोसले यांच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोल्हापूर येथे तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने त्यांची 10 ते 15 किलो चटण्यांची ऑर्डर 50 किलो चटण्यांवर गेली. तेथे कुठेतरी जम बसत असताना त्यांच्या पतीची पुन्हा सातारा येथे बदली झाली. त्यामुळे वैशाली यांच्यापुढे पुन्हा व्यवसायाचे आव्हान उभे राहिले. सततच्या बदल्यांमुळे व्यवसायवृद्धी होणार नाही. हा विचार करून कोठेतरी एकाच ठिकाणी व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी कराड शहराची त्यांनी निवड केली. गत चार वर्षांपूर्वी समीर प्रोसेस फूड ऍन्ड समीर ट्रेडिंग कंपनीच्या नावाने त्यांनी कारखाना सुरू केला. आज अनेक महिलांच्या हाताला वैशाली यांच्यामुळे काम उपलब्ध झाले आहे. जिजाई या नावाने त्यांचे एकूण तीस मसाले बाजारपेठेत उपलब्ध आहेत. एवढेच नव्हेतर परदेशातूनही त्यांच्या मसाल्यांना मागणी वाढू लागली आहे.
सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीमध्ये हे मसाले उपलब्ध असल्याने त्यांच्या मसाल्यांना खूपच मागणी वाढली आहे. प्रत्येक मसाल्यामध्ये नाविन्यता आणण्याचा त्या नेहमी प्रयत्न करत असतात. आणि प्रतिवर्षी वेगवेगळे मसाले बाजारपेठेत आणण्याचाही प्रयत्न करतात.
इतकेच नव्हेतर सामाजिक कार्यातही त्या नेहमी अग्रेसर असतात. अनाथ आश्रममधील मुले व परितक्त्या महिलांबरोबर आपला वाढदिवस साजरा करणे, त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरविणे, आपल्याकडे आलेल्या गरजूंना मदत करणे असे उपक्रम त्या राबवित असतात. आपल्याला मिळालेल्या यशात पती प्रशांत भोसले यांचा मोलाचा वाटा असून तेच माझे गॉडफॉदर असल्याचे त्या आवर्जून सर्वांना सांगतात.