भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला एक अत्यंत आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. अशाच स्त्रियांपैकी मंचरसारख्या ग्रामीण भागातील लीलाबाई नामदेव थोरात यांनी विपरीत परिस्थितीत झगडून संसाराचा गाडा चालवला. अशिक्षित असताना आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून सावित्रीच्या या लेकीचा संसारिक जीवनप्रवास जीवनाच्या सर्व आघाड्यांवर खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला आहे.
खेड तालुक्यातील चाकण येथील गेनुबा गणपत साळुंखे यांना लीलाबाईंच्या रूपाने 1960 साली कन्यारत्न झाले. पत्नी भागुबाई आणि गणपत साळुंखे या दाम्पत्याला एकूण आठ अपत्ये त्यापैकी लीलाबाई एक. गेनुबा आणि भागुबाई या दाम्पत्यामध्ये सातत्याने भांडणे होत होती. गेनुबा साळुंखे यांच्या तापट स्वभावामुळे त्यांनी पत्नी भागुबाई आणि आठ मुलांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखविला. अर्थात, भागुबाई आणि त्यांची आठ मुले रस्त्यावर आली. मुलगी लीलाबाई आणि इतर लेकरांना घेऊन भागुबाई साळुंखे दापोडी, पुणे येथे गेल्या. तेथे त्यांनी रस्त्यावर फळांचा व्यवसाय करून आपल्या आठही मुलांचे संगोपन करून त्यांना लहानाचे मोठे केले. आई भागुबाईला लीलाबाईचे संसारासाठी मोलाचे योगदान लाभले.
दरम्यानच्या काळात लीलाबाई 15 वर्षांची झाली आणि विवाहासाठी तिला मागणी येऊ लागली. अशा परिस्थितीत मंचर येथील राजाराम थोरात यांचे सुपुत्र नामदेव थोरात यांच्याशी 1975 साली लीलाबाईचा विवाह झाला; मात्र नामदेवराव थोरात यांची परिस्थिती खूप हलाखीची होती. गावातील एका दारूच्या दुकानात काम करून नामदेवराव थोरात कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते; मात्र आपला नवरा व्यसनी नाही, कष्ट करणारा आहे हे त्यांच्यातील गुण ओळखून लीलाबाईंनी नामदेवरावांबरोबर संसार सुरू केला. मंचरमधील संत रोहिदासनगर येथे 60 बाय 40च्या मोठ्या वाड्यात लीलाबाई आणि नामदेवराव थोरात या दाम्पत्याने एकत्र कुटुंब पद्धतीत आपला संसार नेटाने चालविला.
तद्नंतर काळ जसजसा पुढे जात होता तसतसा थोरात दाम्पत्याचा संसाराचा गाडाही पुढे चालला होता. त्यांना प्रवीण, प्रसाद आणि प्रशांत अशा तीन पुत्ररत्नांचा लाभ झाला. हलाखीची परिस्थिती असताना देखील लीलाबाईंनी आपल्या तीनही मुलांना शिक्षित केले. अडाणी असूनही आणि शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या लीलाबाईंनी संसार कसा करावा हे जगाला दाखवून दिले. नवऱ्याने संसारासाठी दिलेल्या पैशाची बचत करून मुलांना शिकविले आणि संसार सुरू केला.
मुलांना सुशिक्षित करत असताना आणि शिक्षण देत असताना लीलाबाई थोरात यांच्याकडे मुलांना कपडे घेण्यासाठी तुटकी पुंजी सुद्धा नव्हती. अशा अवस्थेत त्यांनी पती नामदेवराव थोरात यांची जुनी कपडे अल्टर करून ती आपल्या मुलांना घालायला दिली. अशा कठीण परिस्थितीत लीलाबाईंनी आपल्या तीनही मुलांना शिक्षित केले. आज प्रवीण, प्रशांत आणि प्रसाद ही मुले विविध क्षेत्रात व्यवसायाच्या निमित्ताने कार्यरत आहेत. मुंबई येथे चर्मकार समाजाच्या महामेळाव्यात आझाद मैदानावर झालेल्या एका विशेष कार्यक्रमात लीलाबाईंना हजारो जनसमुदायाच्या साक्षीने गौरविण्यात आले.
जीवनाच्या सर्व आघाड्यांवर एका अशिक्षित महिलेने आपल्या पतीला योग्य साथ देवून संसाराचा गाडा कसा चालवावा याचे जणू इतरांना प्रशिक्षणच दिले. लीलाबाई थोरात यांचा आदर्श इतर मातांना आदर्शवत असाच आहे. जीवनाची वाटचाल करत असताना कठीण प्रसंगातही सौ. लीलाबाई थोरात यांनी नामदेवरावांना दिलेली संसारिक साथ यापुढेही अशीच राहणार यात तिळमात्र शंका नाही.
अनेक पुरस्कारांनी गौरव
राज्याचे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप, पद्मश्री स्व. नामदेवराव ढसाळ, माजी आमदार स्व. दत्तात्रय वळसे पाटील, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांसारख्या राजकीय मान्यवरांनी देखील नामदेवराव थोरात यांच्या घरी येऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या थोरात दाम्पत्याचा नवी दिल्ली येथे दिल्ली अकादमीचा फेलोशिप पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. तर शून्यातून प्रगती करून संसार कसा करावा हे लीलाबाई थोरात यांनी इतरांना दाखवून दिले. आणि त्यांच्या एकूण संसारिक आणि सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय कलागुण प्रतिष्ठान विचारज्योत पब्लिकेशन पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील सावित्रीबाई फुले हा पुरस्कार देखील लीलाबाईं थोरात यांना प्राप्त झाला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान
गेली 35 वर्षे बलुतेदार संघटनेच्या माध्यमातून लीलाबाई आणि नामदेवराव थोरात या दाम्पत्याने अनेक गरजूंना मदत केली आहे. तर बहुजन समाजातील वंचित लोकांना त्यांच्या न्यायहक्काची जाणीव करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता घरचा प्रपंच पाहतानादेखील समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून लीलाबाई आणि नामदेवराव थोरात यांनी समाजक्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे.
पती नामदेवराव थोरात यांची मोलाची साथ
सामाजिक क्षेत्राची आवड असलेल्या नामदेवराव थोरात यांनी मोलमजुरी करत असताना 1995 साली बलुतेदार संघटनेची स्थापना केला. आणि आपल्या सामाजिक कामाचा श्रीगणेशा त्यांनी सुरू केला. त्यावेळी नामदेवराव थोरात यांना अनेक कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यावेळी घरी येणाऱ्या थोरात यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या रात्रीअपरात्री स्वत: जातीने स्वयंपाक करून जेवणाची व्यवस्था लीलाबाई थोरात यांनी केली. आपल्या पतीला समाजकार्यातही त्यांनी मोलाची साथ दिली.
संकलन
रमेश जाधव
रांजणी