पुणे पालिका विरोधीपक्षनेत्या दीपालीताई धुमाळ
लोकनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ या तत्त्वाची आदर्श अंमलबजावणी करत, गेल्या 25 वर्षांपासून राजकारण, समाजकारण आणि त्याच्या जोडीला अध्यात्माच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अविरतपणे कार्यरत असलेले नाव म्हणजे महापालिकेच्या विद्यमान विरोधीपक्ष नेत्या दीपाली प्रदीप धुमाळ हे होय.
बचत गटांची चळवळ उभारून महिलांना रोजगार, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण-सर्वांगीण विकासासाठी सामाजिक उपक्रम राबवत, सक्रिय राजकारणी आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून दीपालीताईंनी वारजे-माळवाडी परिसराच्या विकासातही मोलाचा हातभार लावला आहे. आपल्या या कामांचा गवगवा न करता प्रसिद्धीपासून स्वत:ला दूर ठेवत निस्वार्थीपणे त्यांचे हे काम 25 वर्षांनंतरही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सुरूच आहे.
एका यशस्वी पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, त्याच प्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागे पुरूषाचाही हातभार असतो. याचीच प्रचिती देत पती प्रदीप धुमाळ हे आपल्यामागे खंबीरपणे उभे असल्यानेच इथपर्यंतचा प्रवास यशस्वी झाल्याचे मृदभाषी असलेल्या दीपालीताई धुमाळ नम्रपणे सांगतात.
मूळच्या रायगड जिल्ह्यातील (सुधागड) पाली येथील असलेल्या दीपालीताईंनी बी.एस्सी.चे शिक्षण घेतले आहे. लग्नानंतर दीपालीताई 1995 मध्ये पुण्यात धुमाळ कुटूंबात सून म्हणून आल्या. पती प्रदीप धुमाळ नुकतेच राजकरणात सक्रीय होताना, त्यांनी सुरू केलेल्या “राजयोग प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दीपालीताईंनी आपल्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात होते. यात सहभागी होतानाच, महिलांच्या उन्नती तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या बचतगटांच्या चळवळीत दीपालाताईदेखील सक्रीय झाल्या आणि बघता-बघता त्यांचा हा प्रवास बचत गटांची एक चळवळ बनली आणि त्यातून शेकडो महिलांच्या हाताला काम मिळून देत रोजगार तसेच आर्थिक सक्षमीकरणाकडे घेऊन गेला. पुढे काही वर्षांतच वारजे-माळवाडी हा परिसर महापालिकेत आल्यानंतर प्रदीप धुमाळ हे राजकरणात सक्रीय झाले.
2002 मध्ये प्रदीप धुमाळ नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर खऱ्या अर्थाने दीपालीताईंच्या राजकीय कारकीर्दीला आकार येण्यास सुरूवात झाली. पती प्रदीप यांच्या कामात मदत करतानाच वारजे परिसरातील समस्या, त्यासाठी आवश्यक उपाययोजना, या भागासाठी कोणत्या सुविधांची नेमकी आवश्यकता आहे, हे दीपालीताईंना जवळून अनुभवता आले. त्याचा फायदा त्यांना 2007 च्या महापालिका निवडणुकीत झाला. प्रदीप धुमाळ नगरसेवक असलेल्या प्रभागात महिला आरक्षण पडल्याने दीपालीताईंना निवडणूक लढवण्याची संधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व शरदचंद्र पवार यांनी दिली. तर नेते अजित पवार आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दीपालीताईंच्या सामाजिक कामाची दखल घेतली त्या निवडणुकीत दीपालीताई मोठ्या मताधिक्याने महापालिकेत निवडून गेल्या. त्यानंतर त्यांनी राजकीय जीवनातही आपला कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यावेळी त्यांनी स्थायी समिती, महिला आणि बालकल्याण समिती, विधी समिती यांच्या माध्यमातून आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यामुळे 2012 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली. मात्र, यावेळी दीपालीताईंना अवघ्या 57 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पराभवाने खचतील, त्या दीपालीताई कसल्या? या पराभवानंतर दीपालीताई पुन्हा महिला सक्षमीकरणाच्या कामात सक्रिय झाल्या. बचतगटांच्या कामाचा विस्तार वाढवला.
महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, व्यक्तिमत्व विकास अशा उपक्रमांतून त्यांनी सामाजिक काम सुरूच ठेवले. यात त्यांना खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली. त्यातून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चार दिवसांचे पुस्तक प्रदर्शन भरवले. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांच्या सहकार्याने बचतबाजार, आठवडे बाजार, गावरान खाद्य महोत्सव या परिसरात भरवला जातो. हे उपक्रम वारजे आणि माळवाडी परिसराचे अविभाज्य घटक बनले असून त्याला संपूर्ण शहरातून प्रतिसाद मिळत आहे.
दीपालीताईंचे हे सामाजिक कार्य जोमात सुरू असतानाच; 2017 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना पुन्हा एकदा या भागातून महापालिकेची उमेदवारी दिली. यावेळी दांडगा जनसंपर्क, सामाजिक काम आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर दीपालीताई पुन्हा एकदा महापालिकेच्या लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिली आणि सक्षम महिला नेतृत्वाला संधी देत आदर्श घालून दिला आहे.
दीपालीताईंच्या समाजकारण आणि राजकरणाला अध्यात्माचीही जोड आहे. त्यांच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला भजनी मंडळ स्थापन करण्यात आले असून वारजे परिसरात गणेश मंदिर आणि विठ्ठल मंदिरही उभारण्यात आले आहे. येथे भजनी मंडळाचे नियमित कार्यक्रम होतात, तसेच हरिनाम सप्ताह, विविध सणही उत्साहात साजरे केले जातात. तर ताई स्वत: आळंदी ते सासवड या मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी होतात. सामाजिक आणि राजकीय जबाबदारी सांभळणाऱ्या दीपालीताई आदर्श गृहिणीही आहेत. त्यांना स्वयंपाकाची आवड असून व्यापातून वेळ काढून त्या आवड जोपासतात. अशा एक नव्हे, तर अनेक पातळ्यांवर संयम, निर्भिडपणा, शांत व मृदुभाषी, सामाजशिल, कुटूंबवत्सल आणि वेळप्रसंगी सर्वसामान्यांसाठी तेवढ्याच तीव्रतेने आक्रमक भूमिका घेणाऱ्या दीपालीताई “सुपर वुमन’ ठरल्या आहेत.
दीपालीताई धुमाळ यांचे कार्य
– वारजे-माळवाडी परिसरात बचतगटांचे संघटन
– शेकडो महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
– बचतगटांसाठी बचत बाजार
– बचत बाजारांसाठी मार्केटिंगची यंत्रणा
– परिसरात आदर्श ग्रंथालय उभारणी
– अत्याधुनिक क्रीडा संकूल उभारणी
– प्रभागात कॅनॉल रस्ता आणि डोंगर रस्त्याचे विकसन
– दरवर्षी वृक्षारोपण मोहीम
– संपूर्ण प्रभागात भूमिगत वीजवाहिन्या
– गंगुबाई धुमाळ बालोद्यानात साहित्यिक कट्टा
– महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
– खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून 2 कोटींचे प्रशिक्षण केंद्र
– पुण्यातील पहिल्या कल्चर ट्रेनिंग सेंटरचे काम सुरू
– 10 वीच्या मुलांसाठी व्याख्यानमाला
– उन्हाळयाच्या सुट्टीत बालचित्रपट महोत्सव
– पालिकेच्या योजनांसाठी नागरी सेवा केंद्र
– महिला व पुरूषांसाठी योग केंद्र
संकलन : सुनिल राऊत (प्रतिनिधी)