पुणे (प्रभात वृत्तसेवा) – लॉकडाऊनमध्ये बैलबाजार बंद असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बी-बियाण्यांची खरेदी करत असतानाच मशागत व पेरणीसाठी बैलजोडी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यामुळे बैलजोड्या जवळपास दुप्पट महागल्या आहेत.
चारा टंचाईमुळे वर्षभर बैलांचा सांभाळ करणे शक्य होत नसल्याने काही शेतकरी प्रत्येकवर्षी पेरणीच्या हंगामात बैलजोडी नव्याने विकत घेतात. पेरणी व कोळपणी नंतर बैलजोडी विकून हंगामात पुन्हा नव्याने बैलजोडी खरेदी करतात. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना बैलजोडी उपलब्ध होत नाही.
ओळखीतून चढ्या भावाने खरेदी करावी लागत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी जनावरांचे बाजार भरतात. काही ठिकाणी यात्रा-जत्रांच्या निमित्ताने बाजार भरतात. मात्र, यंदा सर्वच गावच्या यात्रा रद्द केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी सोडला, तर त्याविषयी फारसे कुणालाच काही देणंघेणं नसल्याचे वास्तव आहे.
राज्यात चाकण, नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, बीड जिल्ह्यातील हिरापूर हे बैलबाजार प्रसिद्ध आहेत. सध्या शेतीची कामे यंत्राद्वारे होत असली, तरीदेखील छोट्यामोठ्या शेतकऱ्यांची अनेक आर्थिक गणिते बैलजोडीवर अवलंबुन असतात.
“स्वाभिमानी’चे मुख्यमंत्र्यांना पत्र
सुरक्षित अंतर राखून राज्यातील बैल बाजार सुरू करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबत संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विविध जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तातडीने मागणीचे पत्र पाठवले आहे. शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असून, खरिप हंगामात या घटकाला दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्याची मागणी या निवेदनात केली आहे.