नवी दिल्ली : स्थलांतरीत मजूर आणि पर्यटकांना घेऊन जाणारी श्रमिक विशेष आणि विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्याने अनेक राज्यात करोनाबाधितांची आयात सुरू झाल्याने त्या राज्यांपुढील प्रश्न गुंतागुंतीचे बनत आहेत. त्यात विशेष रेल्वे सेवा सुरू होत आहे. तर सोमवारपासून प्रवासासाठी आकाशच मोकळे होणार आहे. त्यामुळे या प्रवाशांसाठी अनेक राज्यांनी आपल्या आचार संहिता लागू केल्या आहेत.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेशमधून येणाऱ्या विमानतील प्रवाशांना सात दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईन सक्तीचे केले. यातून गर्भवती महिला आणि दहा वर्षाखालील मुले आणि व्यावसायिक कारणासाठी अल्प काळ आलेल्यांना सवलत देण्यात आली आहे.
व्यावसायिक कारणांशिवाय आलेल्यांना केरळमध्ये 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. तर जम्मू काश्मिरमध्ये आलेल्या सर्व प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करून त्यांची आरटीपीआरसी करोना चाचणी घेण्यात येईल. ती पॉझिटिव्ह आल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात येईल. मिझोराममध्ये हवाई प्रवास करून येण्यापुर्वी सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच आल्यानंतर करोना चाचणी आणि 14 दिवसांचे क्वारंटाईन सक्तीची आहे.
तामीळनाडूने हवाई प्रवासास बंदी करण्याची मागणी केली आहे. मात्र तेथे तिकीट विक्री सुरू असल्याने त्याबाबत स्पष्टता नाही. महाराष्ट्र आणि गोवा सरकारने सर्व भेट देणाऱ्या नागरिकांची चाचणी करणार आहेत. तसेच त्यांना होम क्वारंटाइरन करण्यात येणार आहे.