Hemant Karkare | Vijay Wadettiwar | Ajmal Kasab – 26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही, तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाल्याचा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेता विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच भाजपचे उमदेवार आणि ज्येष्ठ सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. यामुळे ऐन निवडणूकीत नवीन वाद सुरू झाली आहे.
26/11 ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांनी एक दावा केला आहे. या हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांना वीरमरण आले. मात्र, यातील हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाब याच्या गोळीने नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याच्याच गोळीने झाल्याचे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.
एवढेच नव्हे, तर हा पोलीस अधिकारी संघाशी संबंधित असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हे सांगतानाच वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य मुंबईचे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावरही आरोप केले. उज्ज्वल निकम हे या प्रकरणात सरकारी वकील होते. उज्ज्वल निकम यांना ही गोष्ट माहीत होती आणि ती लपवून ठेवल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
26/11 च्या हल्ल्याच्या तपासादरम्यान अनेक मोठ्या गोष्टी समोर आल्या होत्या. मात्र, तरीही उज्ज्वल निकम यांनी त्या समोर आणल्या नाहीत. अशा गद्दार माणसाला भाजपा उमेदवारी का देत आहे, असा सवाल वडेट्टीवार यांनी भाजपाला केला आहे. असं करून भाजपा एका गद्दार माणसाला पाठीशी घालत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
अशाप्रकारे आरोप होणे हे दुर्दैवी – निकम
अशा निराधार आरोपांमुळे फारच दुःख होते. मतांसाठी एवढ्या खालच्या थराला जाईल, असे मला वाटले नाही. हे असे आरोप करून वडेट्टीवार यांनी केवळ माझा अपमान केला नाही तर 26/11 च्या हल्ल्यात ज्या 166 लोकांना प्राण गमवावे लागले, त्यांचा अवमान केला असल्याचेही भाजप उमेदवार उज्ज्वल निकम म्हणाले.
या हल्ल्यात कसाबचा हात असल्याचे पाकिस्तानने देखील मान्य केले होते. कसाबला शिक्षा देण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही अशाप्रकारे आरोप होणे हे दुर्दैवी आहे. अशा लोकांना नागरिकच मतदानातून उत्तर देतील, असे निकम म्हणाले.