कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी आज पडली आहे. आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यात रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार पहिलं आंदोलन कोल्हापूरात होत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.
सुरुवातीपासूनच आंदोलन न करण्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची तलवार उपसली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. हे मूक आंदोलन असणार असल्याचे त्यांनी नंतर स्पष्ट केले होते. आज पहिलं आंदोलन होत असून, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात लोकप्रतिनिधी भूमिका मांडणार आहे.
आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केले. आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली.
संबंधित बातम्या –
▶ हाताला सलाईन, अंगात अशक्तपणा, तरीही धैर्यशील माने भर पावसात मराठा मोर्चात अग्रस्थानी!
▶ मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात संभाजीराजे यांचा मूक एल्गार
▶ मराठा आरक्षण: मान-सन्मान राखून, करोनाचे नियम पाळून आंदोलन करू – संभाजीराजे
▶ उपमुख्यमंत्री अजित पवार शाहू महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केले ‘हे’ विधान
दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र संभाजीराजे यांना दिलं.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन करत महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौऱ्याच्या काळातच त्यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. संपूर्ण दौरा झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर राज्य सरकारला कृती कार्यक्रम निश्चित करण्याचं आवाहन करत आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला होता.