Manoj Jarange patil : मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नयेत या मागणीसाठी जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज भव्य सभा पार पडत आहे. दरम्यान, याच सभेपूर्वी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोठे विधान दिले आहे. विशेष म्हणजे ओबीसी सभेपूर्वी (OBC Sabha) जरांगेंकडून,”मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाजातील राजकीय नेत्यांचा पाठींबा मिळत नाही. जर त्यांचा पाठींबा मिळाला तर, फक्त दोन तासांत मराठा आरक्षण मिळेल,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.
सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे यांनी,”मी एकटा नाही, माझ्या सोबत 50 ते 60 टक्के मराठे म्हणजेच 6 कोटी लोकं आहे. राजकीय लोकांचा पाठींबा मिळत नाही आणि ते देणार देखील नाही. त्यांना फक्ते आम्ही हवे आहे, 70 वर्ष त्यांनी आमचा फक्त वापर केला. आमची तीच अडचण आहे. त्यामुळे मराठा समाजातील सर्व राजकीय नेते एकत्र आल्यास फक्त दोन तासांत आम्हाला आरक्षण मिळेल. नेते एक होत नाही हेच आमचं दुःख आहे. पण आता आम्हाला देखील त्यांची गरज नाही. कारण आता आमचा समाजच एकवटला” असल्याचे त्यांनी म्हटले.
आजच्या सभेत ओबीसी नेत्यांची भूमिका काय असणार, ते काय बोलणार हे पाहू यात, पण यावेळी मराठ्यांना न्याय देण्याबाबत ते बोलतील अशी अपेक्षा आहे. मराठा समाजातील गोरगरिबांच्या मुलांच्या नोंदी सापडत असून, त्यांच्या हक्काचे त्यांना दिले पाहिजे यावर देखील या सभेत बोलले जाईल असे वाटत आहे. मराठा समाजाला देखील अशीच अपेक्षा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्यासोबतच मुस्लीम, धनगर आणि बंजारा समाजाचे शिष्टमंडळ आमच्या भेटीसाठी आले होते. धनगर आणि मराठा समाज एकत्र असून, आम्ही एकमेकांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे धनगर समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण दिलेच पाहिजे, आणि ते देत कसं नाही हे पाहूयात. मुस्लीम आणि बंजारा समाजाचे देखील तेच म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही सर्व चार लहान-मोठे भाऊ एकत्र झाल्यावर सरकारचे काय होणार, यावर त्यांनी विचार करावा. एका एका जातीवर होणारा अन्याय सरकारने थांबवला पाहिजे. ज्याचे त्याचे आरक्षण त्यांच्या लेकरांना दिले पाहिजे. आता वंजारा समाज देखील एसटीमध्ये आमचे आरक्षण असल्याचे सांगत आहे. असे असेल तर सरकारने त्यांना देखील त्यांचे हक्काचे आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी यावेळी जरांगे यांनी केली आहे.