बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावरून पायउतार होतील आणि राहुल पंतप्रधान बनतील याची निश्चिती लोकसभा निवडणुकीतून करा, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.
कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या यांचा कोलारमध्ये रोड शो झाला. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजप म्हणजे असत्याचा कारखाना आहे. तो पक्ष दिलेली आश्वासने पाळत नाही.
त्याउलट, कॉंग्रेस पक्ष दिलेली आश्वासने पूर्ण करतो. केंद्रातील मोदी सरकारमुळे पेट्रोल, डीझेल, गॅस सिलिंडर, खते, डाळी, भाज्यांचे दर वाढले. त्यामुळे देशातील प्रत्येक कुटूंब त्रस्त झाले.
सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी कॉंग्रेसने कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी पाच हमी जाहीर केल्या. सत्ता मिळाल्यानंतर त्या सर्व हमींची अंमलबजावणी आम्ही केली. राज्यातील जनतेने दिलेल्या मतांचा आदर आम्ही शब्द पाळून ठेवला, असे ते म्हणाले.
इंडिया आघाडीचा घटक म्हणून कॉंग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. त्या आघाडीने निवडणुकीनंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयी विचार करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र, सिद्धरामय्या यांच्यासारखे कॉंग्रेस नेते सातत्याने राहुल यांना प्रोजेक्ट करत आहेत.