Maharashtra Winter Season : राज्यासह देशात थंडीचा जोर वाढताना दिसून येत आहे. देशाच्या एका भागात मुसळधार पावसाचा तांडव सुरु आहे तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडीची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील (Maharashtra Weather Forecast) तापमानातही घट झाली आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरडे वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरले आहे.
पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी पडू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. दाट धुक्यामुळे परिसरातील शेत तसेच रस्ते देखील दिसून येत नसल्याचे चित्र होते. दरम्यान, या धुक्याचा परिणाम शेतीपिकांवर होणार असून गारपिटीमूळे वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते. धुक्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.