Maharashtra Winter Season : महाराष्ट्रात सध्या गारठा वाढला असून आता हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यातील थंडी कमी झाली आहे. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ढगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाला आहे. परिणामी किमात तापमानात किंचित वाढ झाली आहे. मात्र, गारठा कायम आहे. परंतु, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाच्या शेवटी नववर्षाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागत आहे. तसेच असा गारठा आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता असून काही भागात पावसाचा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तवला आहे. 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी दरम्यान राज्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अहमदनगर, पुणे, जळगाव, कोल्हापूर आणि महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक थंडी आहे. तसेच 2 जानेवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि अरबी समुद्रावर बाष्पयुक्त ढग निर्माण झाल्यामुळे राज्यासह देशाच्या हवामानावर याचा परिणाम दिसून येणार आहे, त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यात देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.