निमोणे (पुणे जिल्हा) – निवडणुकीच्या आखड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळ्याच राजकीय पक्षातील लोक त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यात आमच्याही चुका आहेत, असे म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याचा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे आज सोमवारी अजित पवार यांचा शेतकरी मेळावा होता यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, काही ठिकाणी हेमामालिनी, धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा उभे राहिले. त्यांचा आणि राजकारणाचा काय संबंध.. तसेच राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा अशी कितीतरी नावे घेता येतील. अमिताभ बच्चन यांनी आधी राजकारणात प्रवेश केला त्यानंतर त्यांना कळलं हे आपलं काम नाही आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिरुर लोकसभेला सर्वसामान्य लोकांशी नाळ असलेल्या व्यक्तीला संधी देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर अजित पवार यांची शिरुर तालुक्यात ही पहिलीच सभा होती. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले, घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस मी तुमच्याकडे अशोक पवारांच्या पॅनलला मतदान करा अशी विनंती करायला आलो होतो. पण त्यानंतर हा दिवटा असं काही वेडवाकडं वागेल अस वाटलं नव्हतं. त्यांनी स्वतःचा मुलगा राज याला कारखान्याचा अध्यक्ष केला. तेव्हा मी म्हणलं होत अरे बाबा याला हि जबाबदारी पेलवेल का…? आणि शेवटी व्हायचं तेच झालं. घोडगंगा कारखान्याला अडचणीतुन मी नक्कीच बाहेर काढील असेही ते म्हणाले.
रविंद्र काळे यांनी केली सडकून टीका –
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले, ते आले आणि त्यांनी लोकसभेची निवडणुकही जिंकली. पण लोकांनी केवळ तुमच्या संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळ तुम्हाला निवडुन दिलंय हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी चार वर्षे मतदार संघाकडे दुर्लक्ष केले. तसेच दादा तुम्हीच म्हणाले होते, अशोकाचं झाड हे एकटच वाढतं, उंच जातं ते फळही देत नाही आणि सावलीही देत नाही. आमच्याही शिरुर तालुक्यात हे अशोकाचं झाड असंच वाढलंय आणि त्याच्या वसव्यामुळे आमचा घोडगंगा कारखाना बंद पडलाय. 25 वर्षे त्यांनी निष्ठावान आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना चटके दिले, अशी टीका आमदार अशोक पवारांवर त्यांनी केली.
अजित पवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचे इनकमिंग –
शिरुरच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी, नागरगाव, आंधळगाव, शिरसगाव काटा, न्हावरे, करडे या गावातील अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, रमेश थोरात, प्रदीप गारटकर, दिलीप वाल्हेकर, वीरधवल जगदाळे, सुरेश घुले, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, सदाशिव पवार, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, वैशाली नागवडे, केशर पवार, कुसुम मांढरे, मोनिका हरगुडे, श्रुतिका झांबरे, तज्ञिका कर्डीले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या टीकेवर खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रत्त्युत्तर दिले आहे. अमोल कोल्हे काय म्हणाले पहा व्हिडीओ –
माझं प्रतिउत्तर…#AjitPawar #AmolKolhe #Shirur #ShirurLokSabhaConstituency@NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @RRPSpeaks @AshokPawarMLA @Devdattanikam @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/7rIWtenANR
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 4, 2024
अजित पवारांच्या टीकेनंतर अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) ‘एक्स’ अकाउंटवर व्हिडिओ ट्विट करत प्रत्युत्तर दिले ते म्हणाले की, “अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं त्यांना उत्तर देणं उचित नाही, असं मी कायम बोलत आलो आहे. पण, अजित पवारांच्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अमिताभ बच्चन यांच्यातील एकाही खासदारास संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचं मी ऐकलं नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न हिरिरीने मांडत असताना पहिल्या टर्ममध्ये तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळाला आहे.
मी राजीनामा देण्याच्या विचारात होतो, मग संसदेत अनुपस्थितीत होतो का? प्रश्न मांडणं बंद केलं होतं का? आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ( सुनील तटकरे ) हे रायगड लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या प्रदेशाध्यक्षापेक्षाही माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय व्यक्तीची संसदीय कामगिरी ही उजवी आहे. असा उमेदवार चूक केल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण, ही अप्रत्यक्षपणे कबुली तर नाही ना? हा प्रश्न पडतो. कारण, ज्या आमदारांच्या पाठिंब्यावर आपण उपमुख्यमंत्री झाला आहात, त्यांना निवडून आणण्यासाठी ‘शिवस्वराज्य यात्रा’ काढण्यात आली होती. यात्रेची संकल्पना मी राबवली.
राज्य सहकारी बँकेची चौकशी सुरू झाल्यानंतर जयंत पाटील यांच्या मदतीनं शिवसंकल्प यात्रा आम्ही पूर्ण केली. विधानसभेचा निकाल आल्यानंतर तुम्ही ( अजित पवार ) माझं कौतुक केलं होतं. त्यामुळे भूमिका बदलल्यानंतर भाषा बदलते का? 10-10 वेळा तुमच्या पक्षात येण्यासाठी निरोप कशाला पाठवले. लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या?” असा सवालही कोल्हेंनी अजित पवारांना विचारला आहे.