कोरेगाव – राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून, आर्थिक आरिष्टामुळे तो आत्महत्या करत आहे. राज्य सरकार वेगवेगळी धोरणे जाहीर करत आहे, पन्नास हजार रुपये कर्जमाफीची घोषणा देखील करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र अद्याप ती शेतकर्यांपर्यंत पोहोचली नाही.
त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने वस्तुस्थितीचे अवलोकन करावे आणि निश्चित धोरण ठरवावे, अशी मागणी माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकरी आत्महत्या आणि पन्नास हजार रुपये कर्जमाफी या विषयावरुन प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी राज्यातील प्रत्यक्ष चित्र काय आहे, हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.