लोणावळा – राज्य परीक्षा परिषद व केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) केंद्रावर बेजबाबदार कारभार पहावयास मिळाला. योग्य नियोजनाअभावी परीक्षार्थी, शिक्षक आणि पालकांचा गोंधळ उडाल्याचे चित्र होते. लोणावळ्यातील व्हीपीएस हायस्कूल येथील केंद्रावर वरील परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) सुरू करण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांची गळती रोखून आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सलग चार वर्षे वार्षिक १२ हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती मिळते. इयत्ता १२ वीपर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा फायदा होतो.
येथील व्हीपीएस विद्यालयात सकाळी दहा ते तीन या वेळेत ही परीक्षा पार पडली. मावळ तालुक्यातील अनेक शाळांमधून जवळपास आठशे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थी वेळेत दाखल होऊनही केंद्र शोधताना विद्यार्थ्यांची पळापळ झाली. मजले खालीवर करत अनेक विद्यार्थ्यांची दमछाक झाली. दूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला. विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कुणीही नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागातून ‘एनएमएमएस’ची परीक्षा देण्यासाठी आले. मात्र, केंद्रावर कसलेच नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड झाली.
– श्रीकांत दळवी, शिक्षक