कृष्णानगर – सातारा – कोरेगाव रस्त्यावर जिल्हा परिषद चौक ते बाँब रेस्टॉरंट चौक या रस्त्यावर वाढणारी अतिक्रमणे ही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. जिल्हा परिषदेपासून विसावानाक्यापर्यंत रस्त्याचा फळविक्रेत्यांना ताबा घेतला असून यापूर्वी एकदा कारवाई होवून देखील पुन्हा विसावानाका परिसरातील परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. त्यातच जिल्हा परिषद चौकात सुरु असलेल्या बॅनरबाजीला कशी परवानगी दिली जाते, असाही सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा ते कोरेगाव रस्त्यावर सर्व मुख्य कार्यालये आहेत. विविध हॉस्पिटल्स आहेत. यामुळे तसेच कोरेगाव, पंढरपूरकडे जाणारी वाहतूक या मार्गे जात असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ असते. विसावानाका परिसरात गतवर्षी फळविक्रेत्यांमध्येच राडा झाल्यानंतर तिथे असलेले सर्व फळविक्रेत्यांच्या गाड्यांची अतिक्रमणे काढून टाकली होती. त्यामुळे विसावानाका परिसर मोकळा श्वास घेत होता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत फळ विक्रेत्यांच्या गाड्या, टेबलांनी पुन्हा रस्त्यावर कब्जा केला असून नागरिकांना रस्ता व फूटपाथदेखील नीटपणे वापरता येत नाही. येथे कार पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे मात्र फळविकेत्यांच्या गर्दी कार कोठे पार्क करायची असा सवाल वाहनधारकांना पडत आहेत.
तीच अवस्था विसावानाक्यापुढे बाँबे रेस्टारंट चौकापर्यंत आहे. तिथेही काही स्टॉल्स रस्त्यावरच लावण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा होत असतो. तर जिल्हा परिषद चौकातील मोठमोठे फलक लावल्यामुळे अनेक फलक पाहण्याच्या नादात अपघात घडलेले आहेत. तर तिथेच अधिकृत प्रवासी थांबा नसल्याने एसटी बसेस मधोमधच उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यता आहे. जिल्हा परिषद चौक ते बाँबे रेस्टॉरंट चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक करून सदर मार्ग प्रशासनाने कायम स्वरूपी फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करावा अशी मागणी नागरीक करत आहे
वाहतूक शाखेकडे दुर्लक्ष
या परिसरात वाहतूक शाखेची क्रेन फक्त दुचाकीस्वारांवर तत्पर कारवाई करताना दिसून येत आहे. परंतू या क्रेनवरील पोलीस कर्मचार्यांसह वाहतूक शाखेला फळविक्रेत्यांमुळे होणारी अडचण, फलक लावल्यामुळे निर्माण होणारा धोका दिसत नाही. नगरपरिषदेचा अतिक्रमण विभाग कधीतरी धडक कारवाई करत असल्याने या व्रिकेत्यांची भीड चेपली गेली आहे. संध्याकाळी या रस्त्यावर अनाधिकृत का नगरपरिषदेच्या आशीर्वादाने अधिकृत चौपाटी अवतरत. दिवसेंदिवस हातगाड्यांची संख्या वाढताना दिसत आहे. रात्री कारवाई करण्यास प्रशासन असमर्थ असल्याने सर्व आलबेल सुरु आहे त्याचा त्रास सर्वांनाच होत आहे.