नवी दिल्ली – करोनामुळे देशभर नागरिकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण दूर घालवण्यासाठी आणि या अडचणीच्या काळात संपूर्ण देशवासिय एकसंध आहेत हे वातावरण निर्माण करण्यासाठी येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी देशातील नागरिकांनी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी आपली वीज बंद करून घराच्या दारासमोर मेणबत्त्या आणि दीपप्रज्जवलीत करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
ज्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी नसतील तर त्यांनी मोबाईल फोनद्वारे प्रकाश पाडून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मात्र हे करताना सोशल डिस्टंसिंग पाळा आणि गर्दी करू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. आज मोदींनी देशाला उद्देशून एक व्हिडीओ संदेश जारी केला त्यात त्यांनी हे आवाहन केले आहे. आपल्या अकरा मिनिटांच्या संदेशात मोदींनी म्हटले आहे की, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना एकटे राहावे लागले असल्याने त्यांच्यात एकाकीपण आले आहे. पण त्यांना आपण सर्व 130 कोटी लोक एकसंध आहोत याची अनुभुती यानिमीत्ताने आपण देऊ शकतो. त्यादिवशी आपण घराच्या बाल्कनीतून किंवा दरवाज्यातून मेणबत्त्या किंवा मोबाईलचा प्रकाश पाडून प्रकाशाच्या दिव्यत्वाची अनुभती आपण घेऊ शकतो असेही त्यांनी नमूद केले.
त्यातूनच आपली आव्हानाचा समर्थपणे मुकाबला करण्याची शक्ती आणि निर्धार अधिक दृढ होईल, असे ते म्हणाले. लॉकडाऊनच्या काळात गरीबांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांना मदत करण्याचे आवाहन करून मोदी म्हणाले की, आपण करोनामुळे निर्माण झालेल्या या अंध:कारातून नवीन उजेडाकडे नव्या आशेकडे जात आहोत असा संदेश आपल्याला यातून द्यायचा आहे. निराश झालेल्यांच्या मध्ये आशेचा नवीन किरण आपल्याला जागवायचा आहे. प्रकाशाची व आपल्या विराट शक्तीची अनुभूती आपल्याला यातून घ्यायची आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
भारत माता आणि तिचे 130 कोटी नागरिक एकत्रितपणे या आव्हानाचा मुकाबला करण्यास सिद्ध आहेत याचा प्रत्यय आपण या उपक्रमातून घडवू या असे आवाहनही मोदींनी यात केले आहे. आपला उत्साह आणि निर्धार या पेक्षा जगात कोणतीही मोठी शक्ती नाही, असे त्यांनी एका संस्कृत श्लोकाच्या आधारे नमूद केले. 21 दिवसांच्या लॉकडाऊनच्या या काळातील नऊ दिवस झाले आहेत, या काळात लोकांनी दाखवलेली शिस्त आणि धैर्य अभुतपूर्व आहे असे कौतुगोद्गारही त्यांनी काढले.
22 मार्चला लोकांनी करोनाशी झुंज देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले हा उपक्रम अनेक देशांसाठीहीं मार्गदर्शक ठरला. करोनासारख्य महामारीचा मुकाबला देश एकसंधपणे आणि सामूहिक जबाबदारीने करू शकतो याचाही प्रत्यय आपल्याला आला त्याची अनुभुती आपण घेऊ शकलो असे त्यांनी नमूद केले. 22 मार्चला देशात जनता कर्फ्यु पाळला गेला होता व त्या दिवशी पाच वाजता सर्वांनी टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून करोनाच्या संबंधात कार्यरत असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रती व डॉक्टर्स तसेच अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्याप्रती आपले आभार प्रकट केले होते.