करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वत्र लाॅकडाऊन केले आहे. ‘गर्दी टाळा करोना पासून दूर रहा’ असा लाॅकडाऊनचा उद्देश आहे. करोना विषाणूंचा चांगला फटका जागतिक क्रीडा स्पर्धाना झाला आहे. येत्या जुलै महिन्यात ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन जपान मध्ये करण्यात आले होते परंतु करोना विषाणूंचा वाढता प्रभावामुळे या स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचे घोषित केले. खेळाडूंना सरावासाठी जास्त वेळ मिळाला आहे.
ऑलिंपिकमधील पाच वर्तुळे एकमेकांपासून दूर करून वेगळ्या पद्धतीने लोगो तयार करत खेळापेक्षा आरोग्य महत्वाचे असा संदेश दिला आहे. 29 मार्च मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इडीयन प्रीमीअर लीगची(आयपीएल) तारीख पुढे ढकलली गेली असून आयपीएल प्रेक्षकाविना घेण्याचा निर्णय भारतीय क्रीकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला होता पण आयपीएल आणि टी-20 विश्वकरंडक या स्पर्धेचे वातावरण प्रेक्षकांविना सुतका सारखे वाटू लागेल. क्रिकेट मैदानावर खेळाडू एवढेच प्रेक्षकांना महत्व आहे. विराट कोहली, धोनी, रोहित शर्मा याचे चाहते अनेक आहेत. एखाद्या फलंदाजाने षटकार, चौकार किंवा गोलंदाजाने चांगल्या फलंदाजाला बाद केले तर प्रेक्षकांकडून येणार्या टाळ्या, नावाचा गजर या वातावरणाचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही.
आयपीएल पेक्षाही चाहत्यांचे आरोग्य आणि देश महत्त्वाचा आहे. या स्पर्धा पुढील वर्षी खेळल्या जावू शकतात.रिकामे मैदान ठेऊन स्पर्धा घेणे अयोग्य राहील. टी-20 विश्वकरंडकचे सामने येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया या ठिकाणी घेण्याचे ठरवले होते. करोना विषाणू वाढत राहिला तर टी-20 विश्वकरंडकचे सामने रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो पर्यंत ‘वेट अँड वाॅच’ या वाक्यानुसार वागून सध्याच्या परिस्थितीची जाणिव ठेऊन करोना या संसर्गजन्य विषाणूंचा सामना केला पाहिजे.
– प्रियांका निवडुंगे,
कॉलेज रिपोर्टर,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,तळेगाव दाभाडे