सातारा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारविरोधात दि. २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानुसार राजधानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची रविवारी साताऱ्यात बैठक पार पडली यात लाखोंच्या संख्येने राजधानी साताऱ्यातील मराठा बांधव शनिवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून पायी मुंबईकडे रवाना होणार आहेत.
रविवारी राजधानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची एका हॉटलेमध्ये बैठक पार पडली. यात दि. २० जानेवारी रोजी सकाळी शिवतीर्थ पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायी मुंबईकडे लाखोंच्या संख्येने रवाना होणार आहेत. यात ठराविक अंतरावर एकूण पाच मुक्काम असणार असून दि. २६ रोजी पायी मोर्चा मुंबईत धडकणार आहे.
पाच दिवस मुक्काम करून दि. २६ रोजी मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकणार आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार पाहायला मिळणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केल्यानंतर शासनाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यामध्ये जरांगे-पाटील यांनी शासनाला मुदत दिली. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी तिसऱ्या टप्यातील महाराष्ट्र दौरा सुरू केला.
त्यामध्ये जिल्ह्यामध्ये मायणी, कराड, सातारा, मेढा व वाई तालुक्यांत मोठ्या सभा झाल्या. एक डिसेंबर २३ पासून जिल्ह्यामध्ये गावामध्ये आंदोलन सुरू झाली. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी सरकारला आता आरपारची लढाईचा इशारा दिला. यात त्यांनी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आमरण उपोषणास बसणार असल्याचे सांगितले. त्यावर आंतरवाली सराटी येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावर प्रत्येक जिल्हयात सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबईला जाण्याची तयारी सुरु केली आहे.
नियोजनाची अंतिम बैठक १० रोजी
याबाबत गावोगावी, सर्कलनिहाय बैठका घेऊन नियोजन सुरु केले आहे. सुमारे १५ दिवस पुरेल इतका धान्य साठा वाहनातून नेण्यात येणार आहे. या पायी पदयात्रेत भजन-कीर्तन, टाळमृदूंग वाजवत हरिनामाचा गजर करत पदयात्रा मुंबईकडे जाणार आहे. याबाबत नियोजनाची अंतिम बैठक दि. १० रोजी पार पडणार आहे. यात नक्की कोठे मुक्काम करायचे, पदयात्रेचे स्वरूप ठरणार आहे. तर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मुख्य गाव, शहर याठिकाणी त्या परिसरातील मराठा बांधव या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.