सातारा – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील मुनावळे गावात नुकतेच नववर्ष स्वागताच्या निमित्ताने झालेल्या जल्लोषात पर्यावरण विषयक नियमांची पायमल्ली करण्यात आली असून या प्रकरणातील हुल्लडबाज पर्यटनाला पाठबळ देणाऱ्या रिसॉर्ट्सवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सोळवंडे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या कक्षेत पाच गावे आहेत. त्यातील मुनावळे या ठिकाणी वासोटा रिव्हर साईड रिसॉर्ट नावाच्या अनधिकृत रिसॉर्टसह अनेक बांधकामे या संवेदनशील परिसरात बेकायदेशीररित्या उभी राहिली आहेत.
येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या पार्टीत या संवेदनशील परिसरात येथील सर्व रिसॉर्ट चालकांनी मोठ्या प्रमाणात ध्वनी मर्यादा ओलांडून डॉल्बीच्या दणदणाट केला. त्यामुळे येथील वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बफर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे लेसर लाईटस्, ध्वनीक्षेपक लावण्यास प्रतिबंध असताना येथील रिसॉर्ट चालकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे.
कोयना जलाशय महत्तम पुरपातळी रेषा निश्चित करून, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, सह्याद्रीतील जैवविविधता व कोयनेतील निसर्गसौंदर्य वाचवण्यासाठी संबंधित डॉल्बीचा दणदणाट करून वन्यजीवांना धोका निर्माण करणाऱ्या तसेच बेकायदेशीर बांधकाम करून रिसॉर्ट चालवणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करावी.