कोपरगाव – सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने कोकमठाण गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आपण यशस्वी झालो, याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कोकमठाण पुरक पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन या योजनेच्या साठवण तलावात आज पाणी सोडण्यात आले. त्यावेळी जलपूजन आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत परमानंद महाराज, स्नेहलताताई कोल्हे आणि आत्मा मालिक परिवारातील संतगण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
त्यावेळी कोल्हे बोलत होत्या.
कोल्हे म्हणाल्या, सर्वाधिक लोकसंख्या आणि विस्तीर्ण क्षेत्रफळ असलेल्या कोकमठाण गावात प्रामुख्याने आत्मा मालिक ध्यानपीठ असलेल्या जंगली महाराज आश्रमातील भक्तगणांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या ठिकाणी पाणीपुरवठा योजना होणे गरजेचे होते.
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मतदार संघातील विविध विकासकामे करताना या योजनेच्या कामाला प्राधान्य दिले. त्यानुसार आठ कोटी 35 लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. त्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण होताच आश्रमालगत असलेल्या शेती महामंडळाची जमीन मिळवीली.
या कामात तत्कालीन गृहनिर्माणमंत्री तथा आत्मा मालिक ध्यानपीठाचे विश्वस्त प्रकाश मेहता यांची मोलाची मदत झाली. हा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटले. संत परमानंद महाराज म्हणाले, या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांनी आम्हाला सहकार्य केले. या नवीन योजनेसाठी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे मोठे योगदान आम्हाला लाभले. आज साठवण तलावात पाणी सोडण्यात आल्याने हा आमच्यासाठी निश्चितच भाग्याचा क्षण आहे.
यावेळी आत्मा मलिक ध्यानपीठाचे संतगण, पदाधिकारी, कोकमठाण पाणी पुरवठा अध्यक्ष शरद थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, आश्रमाचे हनुमंत भोंगळे, सरपंच पोपटराव पवार, उपसरपंच अनिता रक्ताटे, माजी सरपंच अलका लोंढे, हरिभाऊ लोहकणे, जालिंदर निखाडे, मारुती बिडवे, ऍड. महेश भिडे, वैभव नेटकर, विलास देशमुख, राजेंद्र रक्ताटे, संदीप चाळक, उत्तम चव्हाण, रवींद्र चाळक, अप्पासाहेब आबक, किसन फटांगरे उपस्थित होते.