नगर -शहरासह उपनगरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविणारी अमृतपाणी योजना महापालिकेतील नगरसेवकांचा नाकर्तेपणा व टक्केवारीच्या राजकारणाने बारगळली असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. अशा सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती ऍड. कारभारी गवळी यांनी दिली.
शहराचा पाणी प्रश्न सोडविणाऱ्या अमृत पाणी योजनेसाठी केंद्र सरकारने 135 कोटी रुपयाचे निधी दिला आहे. ही योजना वेळेत कार्यान्वीत झालेली नाही. या योजनेमुळे भविष्यातील 10 ते 15 वर्षाचा पाणी प्रश्न सुटणार होता. मात्र, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे ही योजना बारगळली. या योजनेचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने देखील पळ काढला आहे.
नगरसेवक फक्त टक्केवारीच्या कामात गुंतले असून, अनेक नगरसेवकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाणी विक्रीचे धंदे सुरु केले आहेत. सर्वसामान्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे पाण्यावर पैसे कमविण्याचे व्यवसाय शहरात सुरु झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मत खरेदी करुन निवडून येणाऱ्या नगरसेवकांमुळे नागरिकांवर वाईट दिवस आले आहेत. काही कामाचा निधी आल्यास सत्ताधारी व विरोधक त्याच्यावर तुटून पडतात असा ही आरोप गवळी यांनी केला आहे.