-माधव विद्वांस
नारायण सदाशिव मराठे तथा “केवलानंद सरस्वती’ यांची आज जयंती. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 रोजी कोंकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या, देवगड तालुक्यात वाड्याजवळच्या पडेल येथे झाला. (काही ठिकाणी कुलाबा जिल्ह्यातील सुडकोली गावी झाला असे लिहिले आहे.)
वडील संस्कृत जाणते असल्याने घरातच त्यांना संस्कृतचे प्राथमिक धडे मिळाले. त्यांचे पुढील शिक्षण प्राचीन पद्धतीने गुरुगृही झाले. वर्ष 1895 मध्ये वाई येथे आले. तेथे ऋग्वेद, संस्कृत काव्यवाङ्मय आणि व्याकरण, न्याय, वेदान्त, मीमांसा इत्यादींचे अध्ययन प्रज्ञानंदसरस्वती यांच्यापाशी झाले.
ते योगविद्या जाणकार होते. त्यांनी वाई येथे स्वतःची पाठशाळा 1901 पासून सुरू केली. त्याच पाठशाळेचे “प्राज्ञपाठशाळा’ असे नामकरण 1916 साली केले. दिनकरशास्त्री कानडे, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी इत्यादी त्यांचे नामवंत शिष्य होत.
वाई हे गाव प्राचीन काळापासून संस्कृत अध्ययनाचे केंद्र होते. ती परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. आचार्य विनोबा भावे, वर्ष 1916 मध्ये वेदांताच्या अध्ययनासाठी वाई येथे आले व प्राज्ञपाठशाळेत स्वामी केवलानंद सरस्वती यांचेकडे अध्ययनासाठी राहिले.1920 साली प्राज्ञपाठशाळेस राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. त्यातून अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले. त्यांनी 1925 साली धर्मकोशाच्या कार्यास प्रारंभ केला.
वर्ष 1952 ते 1966 या कालावधीत संस्कृतमध्ये 7 खंडामध्ये मीमांसाकोशाचे संपादन केले. हिंदुधर्म सुधारणेची चळवळ चालू ठेवण्याकरिता वर्ष 1934 मध्ये भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, रघुनाथ शास्त्री कोकजे, केशव लक्ष्मण दप्तरी, ना. गो. चापेकर, ज. र. घारपुरे, म. म. श्रीधरशास्त्री पाठक इत्यादी विद्वानांच्या साहाय्याने, धर्मनिर्णयमंडळ स्थापिले.
ब्रह्मचर्यातूनच 1931 साली त्यांनी संन्यास घेतला. संन्यास घेतल्यावर बद्रिनाथची पायी यात्रा केली. करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्व विशेष. वाईतील कृष्णेच्या काठावर गंगापूरी घाटावर ते मठमध्ये राहत असत. त्यावेळी हे ठिकाण निर्जन होते. आजही हे ठिकाण अतिशय निसर्गसुंदर आहे. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक गुप्तपणे येथे भेट देत असत. कै. यशवंतराव चव्हाणही येथे येत असत.
वाई येथे त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे स्मारकमंदिर उभारले असून येथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. वर्ष 1975 पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. त्यांचे भव्य स्मारक त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी उभे केले. तेथेच मराठी विश्वकोशाचे कार्यालय आहे.
11 मे 1951 रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सौराष्ट्रातील (गुजरात) सोमनाथ येथे मंदिरात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे पौरोहित्य केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले. वर्ष 1954 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासही ते आपले शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याबरोबर उपस्थित होते. 1 मार्च 1955 रोजी वाई येथे त्याचे निधन झाले.