गेल्या शुक्रवारी लोकसभेत जी चर्चा झाली व त्या चर्चेत पंतप्रधान नेहरूंनी जे विचार प्रकट केले त्यावरून असे दिसते की, पाकिस्तानाची लष्करी स्वारी ही काही असंभाव्य गोष्ट नाही. जिहादाच्या गर्जना गेली कित्येक वर्षे, काश्मीरचा प्रश्न उपस्थित झाल्यापासून चालूच आहे.
पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान नबाबजादे लियाकतखान यांनीसुद्धा जाहीर सभेत हिंदुस्थानाला उद्देशून मूठ वळली होती आणि वळलेली मूठ काही मिनिटे कायम ठेवून प्रचंड टाळ्या मिळविल्या होत्या. तेव्हापासून पाकिस्तानाचे मंत्री व इतर मुत्सद्दी युद्धाच्या गर्जना करीत आले आहेत. परंतु या आरडाओरडीचा भारताने गंभीरपणे विचार करावा अशी परिस्थिती कधीच उत्पन्न झाली नव्हती. ती परिस्थिती आता उत्पन्न झाली आहे, असे पंतप्रधान नेहरू यांच्या लोकसभेतील भाषणावरून दिसते.
याशिवाय अवांतर बातम्याही आहेतच. एक बातमी अशी आहे की, येत्या फेब्रुवारी अगर मार्च महिन्यात पाकच्या फौजा काश्मिरात घुसणार व चोवीस तासांच्या अवधीत तो प्रदेश हस्तगत करणार. अर्थात, यात सत्याचा अंश किती आहे हे समजण्यास मार्ग नाही. तथापि, पं. नेहरू यांचे पुढील उद्गार माननीय आहे – “”आज, उद्या व पुढे कधी पाकिस्तान व हिंदुस्थान यांच्या दरम्यान युद्ध होईल असे मला वाटत नाही. परंतु ती गोष्ट अगदीच अशक्य आहे असे मी म्हणू शकत नाही. तेव्हा त्या दृष्टीने तयारी करणे अवश्य आहे.” एरवी पाकिस्तानासारख्या छोट्या राष्ट्राचे भय बाळगण्याचे कारण नव्हते. परंतु पाकिस्तानाला अमेरिकेकडून फार मोठी लष्करी कुमक मिळत आहे व भीतीचे खरे कारण हेच आहे.अशा स्थितीत, भारताने कितीही तयारी केली तरी अमेरिकन सामर्थ्याचा प्रतिकार करण्यास पुरी कशी पडणार?
पं. नेहरू म्हणाले की, रशिया अथवा चीन या देशांचे साह्य मागण्याचा आमचा विचार नाही. परंतु अशी काहीतरी तजवीज केल्यावाचून अमेरिका पुरस्कृत पाकिस्तानाचा बंदोबस्त आपण कसा करणार याचा उमज पडत नाही. अंदाज असा चालतो की, रशियाच्या मदतीची आम्हास गरज नाही असे बाह्यतः जरी आमचे राज्यकर्ते भासवीत असले तरी आतून त्यांनी काही तरतूद करून ठेवली असावी. आणि तशी काही तरतूद नसली तरी रशिया स्वस्थ बसेल व या भागात अमेरिकेचे सामर्थ्य वाढू देईल हे शक्य नाही.