नगर – साकळाई योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तथापि, महाविकास आघाडी सरकार त्यावर अजूनही काम करू शकलेले नाही. उपलब्ध निधीतून सरकारने तातडीने पुढील कार्यवाही करावी. अन्यथा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली “साकळाई’साठी जनआंदोलन उभारू, अशी भूमिका मांडून खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा साकळाई योजनेवर लक्ष केंद्रीत केले आहे.
नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खेळते भांडवल म्हणून वाळकी, वडगाव तांदळी येथील शेतकऱ्यांना 11 कोटी रुपयांचे धनादेश देण्यात आले. हे धनादेश वाटपासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, सरपंच स्वाती बोठे, दिलीप भालसिंग, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, संतोष भापकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कामच येत नसेल, तर त्यांनी त्वरित बाजूला व्हायल हवे.
राज्याचे प्रश्न आम्ही सोडवू. केंद्र सरकारने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नगर जिल्ह्यास 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. राज्यातील आघाडी सरकारने त्यातून काय दिले? हे आधी सांगावे, असे आव्हानच विखे पाटील यांनी दिले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्राकडे सातत्याने जीएसटीचे पैसे मागत आहे. जीएसटीचे अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करतो. परंतु, त्यातून शेतकऱ्यांना काय देणार? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.
पाचपुते म्हणाले, “”जिल्हा सहकारी बॅंक कारखानदारांची होती. ती आता माजी मंत्री कर्डिले यांनी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचविली.” जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा सहकारी बॅंक नेहमीच धावून येईल, अशी भूमिका माजी मंत्री कर्डिले यांनी व्यक्त केली. करोनामुळे आधीच नुकसान झालेले असताना अतिवृष्टीने शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. त्यांना मदतीची गरज असल्याची भूमिका कर्डिले यांनी मांडली. प्रास्ताविक दिलीप भालसिंग यांनी केले. भाऊसाहेब बोठे यांनी आभार मानले.