मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात येत आहेत. पोलिसांना टार्गेट देण्यात आले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेना यांना लक्ष्य करा. त्यामुळे पोलीस ते इमानेइतबारे करत आहेत. मात्र या सगळ्यात गुंड मोठे होत आहेत त्यांना राजाश्रय मिळतो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना,’संदीप देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. त्यांच्याप्रमाणेच कुणावरही हल्ला होणं हे चुकीचंच आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना अटक करून शासन दिलं पाहिजे’ असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. ठाण्याचा गृहविभाग हा महाराष्ट्रापेक्षा वेगळा आहे. ठाण्यामध्ये जे काही चालतं त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यावी लागेल. आम्ही नुसता आरोप करत नाही तर पुरावा देत आहोत. मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात घडणाऱ्या गैरप्रकारांचं गांभीर्य ओळखलं पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
तसेच लोकांना आता ठाण्यात भीती वाटू लागली आहे. दिवसाढवळ्या ठाण्यात खून, मारामारी, हल्ला करणं. कुणाची तक्रार न नोंदवून घेणं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत हे काही चांगलं नाही असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. ठाण्यात अवस्था अशी आहे की जो PI आहे तो २०१७-१८ मध्ये PI झाला आहे. ज्युनिअरच्या हाताखाली सिनीयरला काम करावं लागतं आहे. मी सभागृहातही ठाण्यातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मांडला. ठाण्यातल्या कल्याणमध्ये पोलिसांच्या मारहाणीत दीपक भिंगारदिवे नावाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, असे त्यांनी यावेळी म्हटले.
त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी परदेशी नावाच्या गुंडाचा गळा चिरण्यात आला. काल राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जीवन पाटील याच्या डोक्यावर दुसऱ्या गुंडाने हल्ला केला. ठाण्यात कायद्याची भीती कुणालाच राहिली नाही. या सगळ्यामध्ये पोलिसांचा दोष आहे असं वाटत नाही. पोलीस हुकूम पाळत आहेत पण यामुळे ठाण्याचं वाटोळं सुरू झालं आहे. येऊरच्या जंगलात तर २४ तास दारु मिळते, वेश्या व्यवसाय चालतो असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.