जेजुरी – अजित पवार हे तडफदार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या येण्याने आमच्या सरकारच्या कामाला वेग आला आहे, असे तोंडभरून कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरीत आज ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पार पडत आहे यावेळी फडणवीस बोलत होते.
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, पुण्याचा खरा विकास करायचा असेल तर पुरंदर विमानतळशिवाय विकास होऊ शकत नाही. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता काम केलं पाहिजे. मी पुण्यातून नव्हे तर नागपूरमधूनच निवडणूक लढणार आहे पण पुण्याचा विकास करण्यासाठी पुरदंर विमानतळ झाले पाहिजे.
पुढे बालताना फडणवीस म्हणाले की, लोकांना आता लवकरच कार्ड मिळणार असून दवाखान्यात उपचारासाठी आता एक रुपयाही खर्च येणार नाही. पुढे विविध विकासकामांची माहिती देताना ते म्हणाले, सरकारने महिलांसाठी मोठी योजना आणली. त्यामुळे प्रत्येक घरातील महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास करता येतोय. राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यासोबतच मुलगी जन्माला आली की 5 हजार रुपये, सातवीत गेली की 8 हजार रुपये आणि 18 वर्षांची झाली की 75 हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
फडणवीस यांच्या भाषणातील इतर महत्वाचे मुद्दे –
-राज्यातील रस्ते, रेल्वे स्थानकांची कामेही सुरु आहेत.
-पुण्यातील रिंग रोडचंदेखील काम सुरु कऱण्यात येणार आहे.
– सिंचनाच्या सोयीकरीता ज्या योजना पुढे य़ेतील त्यासाठी सरकार मदत करणार आहे.
-पुणे आणि पिंपरी-चिंचडवडसह राज्यातील मोठ्या महापालिकांचं सांडपणी प्रक्रिया करुन उद्योगाला देण्याचा विचार सुरु आहे.
-सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट एअरपोर्टच्या माध्यमातून शेतीकरीता सुरु होऊ शकतो.