अहमदाबाद – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज पाहुण्या वेस्ट इंडिजशी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी मैदानात उतरेल. रोहितच्या संघाला या सामन्यासह तीन एकदिवसीय सामन्यांची ही मालिका जिंकण्याची आज संधी आहे.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर सलामीला पहिल्या सामन्यातून कौटुंबिक कारणाने माघार घेणारा लोकेश राहुल कर्णधार रोहितसह डावाची सुरुवात करेल. या स्थितीत इशान किशनला बाहेर बसावे लागण्याची चिन्हे आहेत.
दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
वेळ : दुपारी 1ः30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार नेटवर्क
रोहितने पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली असल्याने त्याचा आत्मविश्वास उंचावला असला तरीही संघाचा कर्णधार म्हणून त्याच्यासमोर मधल्या फळीतील प्रमुख फलंदाजांना येत असलेल्या अपयशाची चिंता आहे.
– प्रथमच नेतृत्व करताना रोहितला मालिका विजयाची संधी
– सलामीचा प्रश्न सोडवण्याचेही आव्हान
– वेगवान गोलंदाजांमध्ये बदलाची शक्यता
– खेळपट्टी फिरकीला साथ देणारी ठरत आहे
– प्रसिद्धा कृष्णाच्या जागी बिष्णोईच्या समावेशाची शक्यता
– संघात तीन फिरकी गोलंदाजांचा समावेश शक्य
– महंमद सिराजसह शार्दुल वापरणार नवा चेंडू
माजी कर्णधार विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन चौकार मारून थाटात सुरुवात केली होती. मात्र, अनावश्यक आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात तो केवळ 8 धावांवर बाद झाला होता. पहिल्या सामन्याद्वारे पदार्पण केलेला दीपक हुडा व अनुभवी सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. मात्र, हे दोघे अपयशी ठरले तर तळातील फलंदाज अननुभवी असल्याने रोहित अंतिम संघ निवडताना कोणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच पहिल्या सामन्यातील विजयी संघ याही सामन्यात कायम ठेवला गेला तर राहुलला बाहेर बसावे लागणार आहे.
चहलच निर्णायक ठरेल
भारताचा अव्वल लेग स्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहल याने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शेमार ब्रुक्स, निकोलस पूरन, कॅरन पोलार्ड व अल्झारी जोसेफ या चार प्रमुख फलंदाजांना बाद केले होते. त्यांना चहलने टाकलेले गुगली चेंडूच समजले नव्हते. ही खेळपट्टी पाहता या सामन्यातही चहलची फिरकी गोलंदाजीच निर्णायक ठरेल.