प्रत्यक्ष ताबारेषेवरून (लडाख) – भारतावर दबाव टाकण्यासाठी सहा उंच शिखरांवर ताबा मिळवण्याचा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा प्रयत्न भारतीय लष्कराने गेल्या 20 दिवसांत हाणून पाडला. भारतीय लष्कराने त्या पर्वतीय क्षेत्रात ठाण मांडली आहे. हा भाग फिंगर चारमध्ये मोडणाऱ्या पर्वतरांगांत आहे.
मंगर, गुरूंग, रेझांग ला, रेचेन ला, मोखपरी आणि या भागातील सर्वात उंच असणाऱ्या शिखरांवर भारतीय जवानांनी कब्जा मिळवल्याच्या वृत्ताला दिल्लीतील केंद्र सरकारच्या उच्च पदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. या पर्वतरांगा पॅन्गोंग त्सो तलावाच्या उत्तर ते दक्षिण किनाऱ्यापर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे या भागात भविष्यात युद्ध झालेच तर उंचीवर असल्याचा लाभ भारतीय जवानांना होणार आहे.
उंच शिखरावर कब्जा मिळवण्याची दोन्ही सैन्यातील स्पर्धा 29 ऑगस्टपासून सुरू झाली. त्यावेळी चीनचे सैन्य ठाकूंग भागाच्या दक्षिणेकडील सर्वात उंच शिखरावर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. तो प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. त्यावेळी उद्भवलेल्या संघर्षात दोन्ही बाजूकडून गोळीबारही झाला होता.
ब्लॅक टॉप आणि हेल्मेट टॉप ही शिखरे प्रत्यक्ष ताबारेषेच्या चीनच्या बाजूला आहेत तर भारतीय जवानांनी कब्जा केलेली शिखरे ही भारतीय भूभागात आहेत. रेझांग ला आणि रेचेन लाजवळ चीनने आता आणखी तीन हजार सैनिक तैनात केले आहेत. तेथे त्यांनी तोफदळही तैनात केले आहे.
पीपल्स लिबरेशन आर्मीने गेल्या काही दिवसांत अतिरिक्त फौजफाटा तैनात करत आपल्या आक्रमणाची तयारी जोरदार केली आहे. त्याला भारताच्या वतीने सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या समन्वयाने भारतीय लष्कर सर्व कार्यवाही करत आहे.