नवी दिल्ली – पूर्व लडाखमध्ये भारत-चीन संघर्ष सुरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु असतानाच चीनने पुन्हा भारतात घुसखोरी करून हवेत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनीही हवेत गोळीबार करत चिनी सैनिकांना माघारी पाठवले. दरम्यान, मागील ४५ वर्षात पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
लडाखमधील पेंगोंग सरोवर दक्षिण किनाऱ्यावरील भागात भारतीय सेनेच्या जवानांनी चीनी सैनिकांवर गोळीबार केल्याचा दावा चीनी सेनेच्या पश्चिम थिएटर कमांडच्या प्रवक्त्याने केला आहे. त्यांच्यानुसार, ७ सप्टेंबर रोजी भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा पार करून चिनी हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. परंतु, चिनी लष्कराने सर्वातआधी हवेत गोळीबार केला. त्यानंतर भारतीय जवानांनी हवेत गोळीबार करुन चिनी सैनिकांना त्यांच्या हद्दीत जाण्यास भाग पाडले. गोळीबाराच्या या घटनेनंतर चुशूल भागात मोठया प्रमाणावर सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे.
Despite grave provocation, own troops exercised great restraint & behaved in a mature & responsible manner. We are committed to maintaining peace & tranquility, however are also determined to protect national integrity & sovereignty at all costs: Indian Army
— ANI (@ANI) September 8, 2020
दरम्यान, ४५ वर्षांपूर्वी २० ऑक्टोबर १९७५ मध्ये अरुणाचलच्या तुलुंगला मध्ये चीनने आसाम रायफल गस्ती सैनिकांवर हल्ला चढविला होता. त्यात चार जवान शहीद झाले होते. यावर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यात भारत चीन सेना आमनेसामने येऊन झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी दुपारी भारतीय हद्दीत घुसत असलेल्या चीनी सैनिकांना भारतीय सेनेने चोख प्रत्युत्तर देऊन पिटाळून लावले होते आणि ब्लॅक टॉप, हेल्मेट टॉपवर ठाणे उभे केले होते.