मुंबई – इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल झाला आहे. त्यांनी त्यांच्या आक्रमक फलंदाजीचे म्हणजेच बॅजबॉलचे भूत भारतीय संघाच्या मानगुटीवर टाकण्यासाठी मिडिया ट्रायलही खूप केली आहे. मात्र, त्यांच्या बॅजबॉलला भारतीय संघाचा विराटबॉल निश्चितच जड जाणार आहे.
एकतर भारतातील खेळपट्ट्या पिरकीला साथ देत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून भारताचे वेगवान गोलंदाजही सातत्याने भारतीय खेळपट्ट्यांवर बळी मिळवत आहेत. त्यातच ही मालिका भारतीय संघाला मायदेशातच खेळायची असल्याने दडपण इंग्लंड संघावरच जास्त राहणार आहे. विराट कोहली सध्या प्रचंड भरात असून त्याचेच मोठे आव्हान इंग्लंडच्या संघासमोर राहणर आहे. त्यांच्या संघाला कमी लेखण्याची चुक भारतीय संघ करणार नाही परंतू सध्याचा भारतीय संघ पाहता इंग्लंडला मालिका जिंकण्यात यश येइल असे मला तरी वाटत नाही, असे मत भारताचे विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इंग्लंडचा संघ प्रदीर्घ सराव शिबिरानंतर भारतात दाखल झाला आहे. येथेही या संघाने सराव सुरू केला आहे. दुसरीकडे भारतीय खेळाडूंनाही चांगलाच घाम फुटला आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना लाल चेंडूंच्या मालिकेत व्यस्त असतील. या दीड महिन्यात हे दोन्ही संघ एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. अशा परिस्थितीत या मालिकेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
टीम इंडियाने गेल्या 11 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाचा शेवटचा पराभव आपल्याच भूमीवर इंग्लंडविरुद्ध झाला. 2012 मध्ये इंग्लंडने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. त्यामुळेच या मालिकेबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
पहिला सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान हैदराबादमध्ये, दुसरा सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणममध्ये, तिसरा सामना 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान राजकोटमध्ये, चौथा सामना 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांचीमध्ये आणि पाचवा सामना 7 ते 11 मार्च दरम्यान धर्मशाला येथे होणार आहे. सर्व सामने दिवसा खेळवले जातील.