राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर आसामात तेथील भाजप सरकारकडून जी प्रचंड दडपशाही केली जात आहे, त्याच्या बातम्या अस्वस्थ करणार्या आहेत. काहीही करून या यात्रेला रोखायचेच असे धोरण त्या सरकारने अवलंबले असल्याचा आरोप केला जात आहे. यात्रेच्या मार्गाला अनुमती नाकारणे, कोपरा सभा घेण्यास बंदी घालणे, यात्रा मार्गावर पायी चालण्यास मनाई करणे, यात्रेला गुवाहाटी शहरात प्रवेशाची अनुमती न देताच त्यांना शहराच्या सीमेवरच रोखून धरणे, 22 जानेवारी रोजी राहुल गांधी यांना शंकर देवांच्या मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करणे, असे असंख्य प्रकार तिथे घडले. एवढेच नव्हे तर यात्रेवर पक्ष कार्यकर्त्यांच्या मार्फत हल्ला करण्याचेही प्रकार घडले आहेत. आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बोरा यांना या सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांची गाडी अडवून या गाडीवरही हल्ला केला गेला आहे.
हे सारेच प्रकार अवाक करणारे ठरले आहेत. त्यातून भाजप सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे हे समजत नाही. यात्रेमुळे आजवर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. यात्रेतील वक्त्यांच्या भाषणांमुळे कोठेही प्रक्षोभ माजलेला नाही; परंतु तरीही प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांच्या यात्रेची अडवणूक करण्यात येत असल्याचे या संबंधातील बातम्या पाहिल्यानंतर लक्षात येते. वास्तविक आसामचे भाजपचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते मूळचे काँग्रेसचेच आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्यावर असा वैयक्तिक आकस धरण्याचे कारण नव्हते; परंतु हा सारा प्रकार दिल्लीहून अमित शहा यांचा फोन आल्यानंतर सुरू झाला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. त्या खेरीज आसामातील हिमंता सरमांचे सरकार या देशातले सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचा जाहीर आरोप राहुल गांधी यांनी केल्याने बहुधा त्यांचे पित्त खवळले असावे.
पण हा आरोप तर विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या सर्वच राज्यांमध्ये भाजप नेत्यांकडून रोज होत असतो. त्यामुळे असल्या राजकीय स्वरूपाच्या आरोपांमुळे सरकार बिथरण्याचे कारण नव्हते. हे जे विविध अडथळे आणले गेले त्यासाठी जी कारणे दिली गेली तीही हास्यास्पद आहेत. आज राहुल गांधी गुवाहाटी शहरात जाणार होते; परंतु आज कामकाजाचा दिवस असल्याने या यात्रेमुळे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना गुवाहाटीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे कारण अजिबातच संयुक्तिक वाटत नाही. काल राहुल गांधी शंकर देव यांच्या मंदिरात जाणार होते; परंतु नेमक्या त्याच दिवशी अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने दोन देवस्थानांमध्ये नाहक वाद निर्माण होईल, असे भंपक कारण देत राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला. नंतर काँग्रेसच्या अन्य नेत्यांना मंदिरात जाऊ देण्यात आले, पण राहुल गांधी यांना बाहेरच ठेवण्यात आले होते. यात्रेवर हल्ले करणार्या कार्यकर्त्यांनी भाजपचे झेंड नाचवत हे हल्ले केले त्यामुळे हे भाजपचेच कृत्य होते या विषयी दुमत उरत नाही.
पण हे सगळे करण्याची भाजपला गरज काय होती, असा प्रश्न निर्माण होतो. भाजप सरकारच्या अशा कृतीमुळे काँग्रेस गप्प बसण्याची शक्यता नव्हतीच. त्या विषयीच्या बातम्या दाबण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसजनांकडून सोशल मीडियाचा वापर करून या बातम्या जगापुढे आणल्याच जात आहेत. त्यातून भाजपवरच नाहक नामुष्कीची स्थिती ओढवते आहे, याची जाण त्यांच्या धुरंधर नेत्यांना का होत नसावी. वास्तविक कालच अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिमाखदार सोहळा पार पडला. सारा देश राममय झाला आणि त्यातून भाजपच्या बाजूने मोठी वातावरण निर्मितीही झाली आहे, असे असताना राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ले करून नाहक त्यांचे महत्त्व वाढवण्याची गरज नाही, याची राजकीय दक्षता तरी भाजपच्या राज्यकर्त्यांनी घेणे गरजेचे होते. राम मंदिराच्या सोहळ्यामधील भाषणांमध्ये आता देशात रामराज्य निर्माण होत आहे आणि देशात सर्वांच्याच कल्याणाचा मार्ग मोकळा झाला आहे अशी विधाने होत असताना तिकडे राहुल गांधी यांना मंदिर प्रवेश नाकारला जात होता व त्यांच्या यात्रेवर हल्ले होत होते.
हा विरोधाभास लोकांच्या निदर्शनाला आल्यानंतर लोकांची आपल्या सरकार बद्दलची प्रतिमा काय होईल याचे भान सत्ताधार्यांनी राखायला हवे होते. मुळात कोणत्याही विचाराला सरकारी यंत्रणेचा वापर करून विरोध करणे किंवा त्यांच्यावर अशी अवाजवी दडपशाही करणे हे कोणत्याच संकल्पनेत बसणारे नाही. लोकशाहीत विरोधकांनाही स्थान द्यावे लागते. किंबहुना परिपूर्ण लोकशाहीसाठी विरोधकांना पूर्ण मोकळीक ठेवण्यानेच लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त होत असतो. परंतु हे तत्त्व सध्याच्या सत्ताधार्यांच्या खिसगणतीतच नाही. या घटनांच्या विश्लेषणातून दुसरा अर्थही काढता येऊ शकतो. तो म्हणजे भाजपला अजूनही राहुल गांधी, काँग्रेस आणि विरोधकांची भीती वाटत असावी. आपल्याला मोठे राजकीय आव्हान निर्माण करणार्या पक्षांची गळचेपी करणे, त्यांच्यावर दहशत माजवणे, केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबून टाकणे असे प्रकार अशा भीतीतूनच होत असावेत, असा अर्थ काढायला वाव आहे. अन्यथा ज्यांच्याकडून आपल्याला काहीच आव्हान दिले जाऊ शकत नाही त्यांच्या वाटेला सत्ताधारी गेले नसते.
राहुल गांधी यांच्या यात्रेवर झालेल्या या अन्यायाला देशभरात मोठी वाचा फुटली आहे. त्याचे मोठे भांडवल या पक्षाने केले तर भाजपचे चांगले वातावरण खराब होणार आहे. साध्या साध्या बाबतीतही राहुल गांधींची या दौर्यात अडचण केली गेली आहे. त्यांना त्या राज्यांतील विद्यार्थ्यांशीही बोलू दिले गेलेले नाही. एका विद्यापीठात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी जाणार होते, त्या कार्यक्रमाला आधी अधिकृत परवानगीही दिली गेली होती; पण नंतर अचानक चक्रे फिरली आणि त्यांच्या या कार्यक्रमाला अनुमती नाकारली गेली. हा रडीचा डाव आहे आणि लोकांची त्यावर फार चांगली प्रतिक्रिया असणार नाही एवढे तरी विद्यमान सत्ताधार्यांनी लक्षात घ्यायला हवे आहे.