मुंबई :– इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने शुक्रवारी रात्री उशिरा संघाची घोषणा केली. ध्रुव जुरेल आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांना संघात संधी देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून ५ कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये, तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये, चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये आणि ५वा कसोटी सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाईल.
डब्ल्यूटीसीच्या दृष्टीने भारतासमोर इंग्लंडचे आव्हान असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी मालिका ऑगस्ट २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये झाली होती. तेव्हा ती मालिका मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. त्याच वेळी, भारतामध्ये दोघांमधील शेवटची मालिका फेब्रुवारी २०२१ मध्ये झाली होती, ही ४ कसोटी सामन्यांची मालिका भारताने ३-१ ने जिंकली होती.
जुरेलची क्रिकेट कारकिर्द…
उत्तर प्रदेशचा यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या २२ वर्षीय खेळाडूच्या नावावर १५ सामन्यांमध्ये ७९० धावांची नोंद आहे. ज्यामध्ये १ शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. अलीकडेच ज्युरेलचाही इंग्लंड लायन्सविरुद्धच्या भारत-अ संघात समावेश करण्यात आला होता.
Team India : ….तर हार्दीक पंड्याला भारतीय संघात पुनरागमन करणे होणार कठीण
आवेश खानला पदार्पणाची संधी…
मध्य प्रदेशच्या आवेश खानला पदार्पणाची संधी आहे. आवेशने ३९ प्रथम श्रेणी सामन्यांत १५४ विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत मोहम्मद शमीच्या जागी आवेशची निवड करण्यात आली होती, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान.