कोल्हार खुर्द -तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील दोन चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. ही घटना विजयदशमीच्या दिवशी (दि.25) घडली. दरम्यान, त्यांच्या मामा व आजीवर लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पाथरेत बुद्रुक येथे वसीम रजाक शेख हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. ते आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करतात.
त्यांची दोन मुले अरहान (वय 5) व आयेशा (वय 4 ) ही मामा शाविद आजिज शेख (रा. हणुमंतगाव, कोंबडवाडी) यांच्याकडे गेली होती. दरम्यानच्या शाविद, अरहान व आयेशा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मागील दोन दिवसांपासून अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यामुळे ते सोनगाव सात्रळ येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेत होते.
मात्र रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अरहान, आयेशा, मामा शाविद व आजी शबाना यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच अरहान यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतराने आयेशा हिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन भाच्यांचा दुर्दैवी मृत्यूची वार्ता मामा शाविद यांना समजल्याने त्यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांना उपचारांसाठी अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. आजी शबानाही रुग्णालयात उपचार घेत आहे. लोणी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.