पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात अचानकपणे कमी दाबाने तसेच अपुरे पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्यास महापालिकेकडून संबंधित भागातील अनधिकृत नळजोडांची तपासणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. असे नळजोड सापडताच कारवाई करून ते तोडले जात आहेत.
प्रशासनाने नुकतेच केशवनगर- मुंढवा परिसरातील ४३ अनधिकृत नळजोड काढले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली. तसेच, शहराच्या इतर भागांतही ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा तळाला गेला आहे.
त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचा तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून केल्या आहेत. त्या अनुषंगाने पाणीकपात करणे शक्य नसल्याने महापालिकेने पाण्याची गळती शोधून पाणी बचत केली जात आहे. उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यानुसार, महापालिका प्रत्येक भागाला समान पाणी देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मात्र, काही भागात अचानक पाणी कमी येण्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. त्या भागांत पाहणी केली असता, अनधिकृत नळजोड तसेच मोटार लावल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ज्या भागात तक्रार आहेत. त्या भागात महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रितसर नळजोड घ्यावेत. असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
तक्रार असलेल्या भागात कारवाई
महापालिकेकडे गेल्या काही दिवसापासून केशवनगर भागातून पाणी टंचाई असल्याच्यातक्रारी येत होत्या. या परिसरात शेवटच्या भागात पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे नागरिक त्रासून महापालिकेकडे तक्रारी करत होते.त्याची दखल घेत पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी याबाबत तपासणी केली असता कुंभारवाडा परिसरात अनधिकृत नळजोड भरपूर आहेत. तिथल्या गोठेधारकांनी आणि नागरिकांनी असे नळजोड घेतले होते.