पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वाढते नागरीकरण आणि खासगी वाहनांमुळे पुणे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागालाही बसत असून “आयटी हब’ असलेला हिंजवडीला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो प्रकल्प सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय ठरणार आहे.
या शिवाय, शहरातील पीएमपीची ई-बस सुविधाही पर्यावरणपूरक असून, मेट्रोला जोडण्यात येणाऱ्या फीडर सेवेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे, असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
शिवाजीनगर गावठाण परिसरात आयोजित केलेल्या प्रचार फेरीच्या सांगता सभेत मोहोळ बोलत होते. ते म्हणाले, आयटी हब असलेल्या हिंजवडीत रोजगाराच्या संंधी आहेत. त्यामुळे या भागातील नागरीकरण झपाट्याने वाढले असून, या मेट्रोचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांना फायदा होणार आहे.
पीएमआरडीए सार्वजनिक खासगी भागीदारीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी, बाणेर, औंध, गणेशखिंड, खैरेवाडी, शिवाजीनगर आदी भागांना एकमेकांशी जोडणारा हा प्रकल्प आहे. भविष्यात हडपसर व लोणी काळभोरपर्यंत विस्ताराची योजना आहे. हा प्रकल्प वेळेत मार्गी लागावा यासाठी आपण सातत्याने राज्यशासन व केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहोत, असे आश्वासन यावेळी मोहोळ यांनी दिले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक दत्ता खाडे, आदित्य माळवे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, गणेश बगाडे, किरण ओरसे, डॉ. अजय दुधाणे, हेमंत डाबी, अपर्णा कुऱ्हाडे, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, दयानंद इरकल, आकाश रेणुसे, संजय तुरेकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.