नगर – करोनाच्या प्रादुर्भावाने सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. प्रामुख्याने शेतकरी अतिवृष्टीच्या संकटाने हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे स्वागत करते. तथापि, शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले हे पॅकेज खूपच अपुरे आहे, अशी भूमिका भाजप नेत्या तथा पक्षाच्या महामंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केली.
भाजपच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथगड येथील दसरा मेळावा संपन्न झाल्यानंतर पुण्याला जात असताना नगरमध्ये काही काळ थांबल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या मोजक्याच पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद केला. माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. आशिष अनेचा, यश शर्मा, डॉ. रवींद्र खेडकर, डॉ. ज्ञानेश्वर दराडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सर्वसामान्यांचे नेतृत्व दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे समर्थपणे चालवित आहेत. दिवंगत नेते मुंडे यांच्याच पद्धतीने पक्षाचे कार्य पंकजा पुढे नेत आहेत. त्यामुळेच पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखी मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.