फुरसुंगी, दि.29 (महादेव जाधव) -पुणे महापालिका सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि “इच्छुकां’नी जोरदार तयारी केली होती. मात्र, निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्याने ऐन सणोत्सवाच्या कालावधीत अनेक “इच्छुक’ हिरमुसले असून त्यांनी खर्चाचे ओझे जड झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पावत्यांवरही अजूनही वर्गणी “येणे’ दिसते आहे. नवरात्रोत्सवात आरतीसाठी आग्रह धरणारे, गरबा, दांडियासाठी “प्रायोजक’ होणाऱ्यांनीही आता प्रभाग रचना व निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरच बघु, अशी भुमिका घेतल्याने उत्सव मंडळांचे नियोजनही फसले आहे.
महापालिका निवडणुका कधी होणार? हे अद्यापही कोणी ठाम सांगू शकत नाही. आरक्षण, प्रभाग रचना, राजकीय पक्षांचे राजकारण आदी मुद्यांवर “इच्छुकां’चेही तळ्यात-मळ्यात आहे. याच कारणातून दसरा-दिवाळीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरंजाम किटसह फराळ, दिवाळी पहाट, स्नेहमेळावा, विविध कार्यक्रम व उपक्रमांवरही अनिश्चीततेचेच सावट आहे. निवडणूक तारीख, प्रभाग रचना तसेच आघाडी, युती की स्वतंत्र निवडणुका लढविल्या जाणार, याबाबतही कोणत्याच पक्षाचा ठाम निर्णय नसल्याने ‘इच्छुक’ उमेदवारांकडून खर्च कमी करण्यात येत आहे, अनेकांनी जरा धिरानेच घेतल्याचे दिसुन येते असले तरी असला तरी “धरल तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं’, अशी त्यांची अवस्था झाली आहे. याच कारणातून तुटपुंज्या खर्चात कार्यक्रम, उपक्रम घेण्यावर अनेकांचा भर असल्याचे स्पष्टपणे दिसून दिसते.
“प्रथम नगरसेवक’ होण्याची इच्छा लागली मावळू…
फुरसुंगी, उरुळी देवाची, हांडेवाडी, होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, येवलेवाडी या समाविष्ट गावांतून मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. परंतु, आता नव्याने समाविष्ट 34 गावांचे स्वतंत्र दोनच प्रभाग होणार असल्याची चर्चा असल्याने जुन्या प्रभागरचनेनुसार परीसरात केलेला खर्च वाया जाणार, या भीतीने “इच्छुकां’ची अडचण झाली आहे. त्यामुळे प्रभागरचना, आरक्षण जाहीर होईपर्यंत जेमतेम कार्यक्रम घेत चर्चेत राहण्याचे धोरण संबंधीतांनी अवलंबले आहे. मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवून आपल्या भागातून “प्रथम नगरसेवक’ होण्याची “इच्छा’ही आता मावळू लागली आहे.