पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या वेळी ‘अब की बार, काँग्रेस की सरकार,’ असा नाराही पटोले यांनी दिला.
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सहकारनगर ते मार्केट यार्ड मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांशी पटोले यांनी संवाद साधला. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातर्फे ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
मार्केट यार्डातील सर्व व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्या अडचणी सोडवण्याचे आश्वासनही व्यापाऱ्यांना दिले.ही रॅली दी पूना मर्चंट चेंबर येथे समाप्त झाली. आबा बागुल, वीरेंद्र किराड, अमित बागुल, अमित भगत, मुक्तार शेख, हेमंत बागुल, संतोष पाटोळे, रमेश सोनकांबळे, रमेश पवार, गोरख मरगळ, विश्वास दिघे, अशोक नेटके, जयकुमार ठोंबरे पाटील आदी कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
पटोले यांनी दि पुन्हा मर्चंटचे माजी अध्यक्ष राजेंद्र बाठीया, सचिव ईश्वर नहार, आशिष दुगडे, नवीन गोयल, श्याम लढा, उत्तम बाठीया, संदीप शहा, सुहास जोशी, आशिष नहार, आदी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या दहा वर्षांच्या काळात जीएसटी कायद्याच्या माध्यमातून सरकारने देशातील नागरिकांना लुटण्याचे काम केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड चीड आहे. त्यामुळे या वेळी भाजपचा पराभव अटळ आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले आहेत. त्यांनी सार्वजनिक उपक्रमांची विक्री करून देशाला कंगाल केले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.