शरद सहकारी बॅंकेच्या वार्षिक सभेत सरकारच्या धोरणावर टीका
मंचर – राष्ट्रीयकृत बॅंकांकडून पाच हजार, दहा हजार कोटी रुपये अशा मोठ्या रकमेची कर्ज घेऊन फरार झालेले कर्जबुडवे आणि त्यांना कर्ज देणारे बॅंकेचे संचालक मंडळ, अधिकारी याच्यावर मात्र केंद्र सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील शरद सहकारी बॅंकेची 49 वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, बॅंकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड आणि ज्येष्ठ संचालक पांडुरंग पवार, सुभाषराव मोरमारे, सचिन भोर, सभापती संजय गवारी, अंकित जाधव, भगवान वाघ, प्रदीप वळसे पाटील,युवानेत्या पूर्वा वळसे पाटील यांसह संचालक, सभासद आणि बॅंकेचे अधिकारी, सेवकवर्ग उपस्थित होते.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, देशातील नागरी बॅंका, सहकारी बॅंका, जिल्हा बॅंका यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सहकार विभाग स्थापन करणार असून, केंद्र सरकार आणि रिझर्व बॅंक इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवणार आहे. शरद बॅंक पन्नास वर्षांपूर्वी काढण्यात आली होती. त्यावेळी संचालक मंडळ शिकलेले नव्हते. मात्र, तरीही ग्रामीण भागातील लोकांनी अनुभवातून शरद बॅंक संस्था वाढवली.
शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले शरद सहकारी बॅंकेसाठी प्रत्येक सभासद महत्त्वाचा असून बॅंक अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. यावेळी बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जोत्स्ना काकडे, सुनील द्नाईत, वसंत कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. चर्चेत जे. एल. वाबळे ,गुलाबराव नेहरकर, प्रभाकर बांगर, राजू इनामदार, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांनी सहभाग घेतला.शिवाजीराव लोंढे यांनी आभार मानले.
स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्या नावे सहकाराचा पुरस्कार
दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंक प्रगतीच्या मार्गावर आहे. भविष्यातही अनेक सामाजिक उपक्रम व सभासदांच्या हिताचे निर्णय बॅंकेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. पुढील वर्षी बॅंक सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने बॅंकेचे संस्थापक स्व. दत्तात्रय वळसे पाटील यांच्या नावाने सहकाराचा राज्य स्तरावरील पुरस्कार बॅंकेच्या वतीने देण्यात येणार असल्याचे देवेंद्र शहा यांनी सांगितले.