राजगुरूनगर – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात खेड तहसीलदार कार्यालयात झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत संजय तेली यांनी दिली. दरम्यान, येथे दुरंगी की तिरंगी लढत रंगणार हे सोमवारी (दि. 7) स्पष्ट होणार आहे.
खेड आळंदी विधान सभा मतदार संघात 13 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती. शनिवारी (दि.5) या अर्जाची छाननी झाली. यावेळी अधिकाऱ्यांसह काही उमेदवार वत्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या छाननीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेले रामदास ठाकूर आणि अनिल राक्षे यांच्या नामनिर्देशन पत्रात नियमानुसार दहा मतदारांचे सुचक म्हणुन नावे नसल्यामुळे हे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
मात्र, दोघांनी अपक्ष म्हणून दाखल केलेली नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. छाननी प्रक्रिये दरम्यान कोणाचाही उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप न आल्याने प्रक्रिया सुरळीत झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
सोमवारी (दि. 7) सकाळी वेळेनुसार उमेदवारी माघारीची प्रक्रीया सुरु होऊन दुपारी तीननंतर चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. यावेळी निवडणूक निरीक्षक पियुष मुखर्जी उपस्थित राहुन उपस्थित उमेदवार आणि प्रतिनिधीना मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतर दुरंगी का तिरंघी लढत होणार यावरुन उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी आणि कोणाचे पारडे जड राहणार याबाबतची पडद्यामागच्या शकुनीमांमाच्या सारीपाटाच्या सोगंट्या कशा पडणार यावर उमेदवारांचे बरेच काही अवलंबुन राहणार आहे.